सातारा : तालुक्यातील काशीळ तसेच समर्थ गाव उपसा सिंचन योजनेसाठी ५३ कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजनेला गती मिळणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरातील महामार्गाच्या पश्चिम भागातील शेतीस पाण्याची उपलब्धता नसल्याने या ठिकाणी समर्थ गाव उपसा सिंचन योजना व काशीळ उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या होत्या, त्यास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उरमोडी प्रकल्पा अंतर्गत पाणी आरक्षित करून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
या योजनेमुळे या विभागातील कायमचा दुष्काळ मिटणार असून सर्वत्र बागायती क्षेत्र तयार होणार आहे या योजनेमुळे ८६२ एकर क्षेत्र बागायती होणार आहे. या योजनेस एकूण पंचवीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. या योजनेस खोडद बंधाऱ्यावरून शंभर मीटर उंचीवर कुंडामधून बंदिस्त पाईप द्वारे पाणी आणण्यात येणार आहे. तसेच काशीळ सिंचन योजने मधून ९३७ एकर क्षेत्रास पाणी उपलब्ध होणार आहे.
या योजनेस अठ्ठावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून खोडद येथील बंधाऱ्याहून १११ मीटर हेडवर बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी पोहोचणार आहे. एकूण त्रेपन्न कोटी रुपयेच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली. मागील आठवड्यात पंचवीस कोटी रुपयेची गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्याचे काम चालू झाले आहे.या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आ. मनोज घोरपडे यांचे सध्या सर्वत्र अभिनंदन होत आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले सर्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांचेही सहकार्य लाभले आहे.