स्वाभिमानी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना कापण्यासह गोळ्या घालण्याची धमकी

पोलिसांसमोरच रविवार पेठेतल्या भाजी मंडईत एका फळकूट दादाने केले डेअरिंग

by Team Satara Today | published on : 09 April 2025


सातारा : रविवार पेठेतील भाजी मंडई परिसरामध्ये सकाळी शेतकर्‍यांच्या जागेवर असणार्‍या दोन टपर्‍यांची अतिक्रमणे काढताना जोरदार वादावादी झाली. यावेळी एका फळकुट दादाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना पोलिसांच्या समोरच कापण्यासह गोळ्या घालण्याची धमकी दिली.

येथील रविवार पेठेतील पोवई नाका भाजी मंडईमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये बसण्याच्या जागेवरुन नेहमीच वाद होत असतात. भाजी मंडईची डावी बाजू आणि तेथील दोन रांगा शेतकर्‍यांसाठी आरक्षित आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जागेवर दोन छोट्या टपर्‍यांचे अतिक्रमण झाले होते. येथील काही शेतकर्‍यांनी याची तक्रार थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्याकडे केली होती. शेळके यांनी या प्रकरणाची थेट माहिती सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिली. आलेल्या तक्रारीवरून पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमण हटवले तसेच शेतकर्‍यांची जागा मोकळी करून देण्यात आली.

त्यावेळी तेथे स्थानिक परिसरात वावरणार्‍या एका फळकुट दादाने तेथे येऊन तू स्वतःला काय समजतोस? असे म्हणत पोलिसांच्या समोरच शेळके यांना कापून टाकण्यासह गोळ्या घालण्याची धमकी दिली. या सर्व बाबीचे चित्रण एक पोलीसही करीत असल्याचे दिसून येत आहे. परिसरावर दहशत राखण्याच्या उद्देशाने या फळकूट दादाने चक्क पोलिसांसमोरच केलेल्या या वल्गनांमुळे मंडईत आलेले नागरिकही अचंबित झाले. शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही संतप्त झाले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. शेळके यांना तेथून तात्काळ बाजूला नेण्यात आले. त्यामुळे येथील वादावर पडदा पडला. पण खाकी वर्दी धारकांसमोरच थेट एखाद्याला संपवण्याची भाषा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असल्या फळकूट दादांचा वेळीच तगडा बंदोबस्त केला नाही तर, याचे डेअरिंग वाढून पोलीस बांधवांवरही हात उचलण्यास हे लोक कचरणार नाहीत आणि कायद्याचा धाकच लोकांवर राहणार नाही, याची जाणीव ठेवून सातारा पोलिसांनी असल्या फळकूट दादांचा कौशल्यपूर्ण बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा सामान्य सातारकर व्यक्त करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'केसरी २' मधील अक्षय कुमारचा नवा लूक रिलीज !
पुढील बातमी
सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकल्याचा त्यांचा अविर्भाव

संबंधित बातम्या