संमेलनाचे शिवधनुष्य सातारकर पेलणार

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले : बारा वर्षाच्या पाठपुराव्याला आले यश

by Team Satara Today | published on : 08 June 2025


सातारा : साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही सातारकरांची इच्छा होती. ती आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण झाली आहे. याबाबत शाहुपूरी शाखा व सदस्यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळेच साताऱ्याला हा मान मिळाला आहे. आता हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तशी क्षमता प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये आहे. यामुळे साहित्य संमेलना चे शिवधनुष्य सातारकर आता मोठ्या ताकतीने पेलतील, असा आत्मविश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान पुणे येथील बैठकीत साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. यानंतर साताऱ्यातील पोवईनाका येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, माजी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, उद्योजक विक्रम पाटील, पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, शाहुपूरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आदी उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अखिल भारतीय संमेलन साताऱ्यात यावे, याबाबत गेल्या बारा वर्षापासून प्रयत्न सुरु होते. अखेर तो निर्णय आज पुणे येथे झाला. स्व. अभयसिंहमहाराज यांच्या काळामध्ये ६६ वे साहित्य  संमेलन साताऱ्यात झाले. आज पुन्हा हा योगायोग ६६ चा उलटा आकडा ९९ हा योगायोग जुळून येत आहे. आता मिळालेला मान हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा आहे. त्यामुळे या नियोजनाची जबाबदारी जिल्ह्याची आहे. आता हे साहित्य संमेलन आपण सर्वजण यशस्वी करुया. कायमस्वरुपी साहित्यकांच्या, श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. जिल्ह्याला मिळालेला बहुमान  असल्याने सर्व साहित्यप्रेमी, वाचक या सर्वांनी आपले योगदान द्यावे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साहित्य संमेलन मिळवण्यासाठी आम्ही काही ठराविक जण पुढे असलो तरी हा मान संपूर्ण जिल्ह्याला मिळाला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. साताऱ्यामध्ये याबाबतचे आर्थिक नियोजनही आपण चांगले करु शकतो. पूर्वी पेन्शनरांचा सातारा असं संबोधल जात असायच. पण आता पेन्शनर राहिले नसले तरी खर्च करणारे लोक उदंड आहेत. साताऱ्यात असणाऱ्या लोकांना या सर्व क्षेत्राची जाण असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या माध्यमातुन सातारकरांना मोठी पर्वणी मिळणार आहे. साताऱ्यात संमेलन यावे, याबाबत साताऱ्यात शाहुपूरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, तत्कालीन सदस्य विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार व त्यांचे सहकारी यांचे विशेष प्रयत्न झाले, याबाबत त्यांचे विशेष अभिनंदन.

विनोद कुलकर्णी म्हणाले, स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी ६६ वे साहित्य संमेलन घेतले. आज ९९ वे साहित्य संमेलन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मिळवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. यावेळी ६६ व्या साहित्य संमेलनाच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. आज बाराव्या वर्षी संमेलनाचा मिळाला आहे.  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी साताऱ्यामधून १ लाख पत्र पाठवण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली येथे २६ जानेवारीच्या आंदोलनामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सहभागी झाले होते. संमेलनासाठी एका मंत्र्याचा आंदोलक म्हणुन पुणेकरांनी अलिकडेच सत्कार केला.

साताऱ्याला संमेलन येण्याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यासह कर्नाटकमधील कुलबर्ग्याचे लोक या कमिटीमध्ये होते. त्यावेळी साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुस्वभावी कसे आहेत. याबाबत प्रत्यक्ष वागणं अन बोलणं ऐकलं अन आमचा राजा सुसंस्कृत आहोत. हे यानिमित्ताने पाहिले. अन त्यानंतरच साहित्य संमेलनाचा साताऱ्याला हा आजचा मान एकमताने साताऱ्याला मिळाला असल्याचे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.  


संमेलनापूर्वी सातारा होणार सुशोभित

साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे हे संमेलन साताऱ्यात येत आहे. साताऱ्यातील या संमेलनाची तारीख  लवकरच साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित होईल. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वांना संमेलन यशस्वी होण्यासाठी साताऱ्याचे सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या संमेलनास बाहेरील देशातून लोकही येणार आहेत. त्यामुळे आपलं शहर, जिल्हा म्हणुन ते सुशोभित दिसण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.  


आता राडा संमेलनाच्या नियोजनाचाच...!

साताऱ्यात साहित्य संमेलन यावे, याबाबत कशा पध्दतीने मागणी करण्यात यावी. याबाबत अनेकदा विषय झाले. त्यावेळी राडा करायचा की, काय? आंदोलनाच्या मार्गातून असा मतप्रवाह आला. पण आज राडा वगैरे याबाबी सोडून दिल्या आहेत. आता राडा करायचाच तर तो साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाचाच. असे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात तितकीच दाद दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव अखेर सातारमध्येच
पुढील बातमी
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; तीन जण जखमी

संबंधित बातम्या