सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरात मोठा गाजावाजा करुन बांधण्यात आलेला कॉंक्रिट रस्ताच खड्ड्यात गेल्याने नक्की ठेकेदाराने रस्ता बांधण्याचे काम केले की, खड्डे खोदण्याचे, असा प्रश्न जाणार्या-येणार्या नागरिकांना पडत असून उंच झालेला रस्ता आणि त्याच्या बाजूला तयार झालेला दीड फूट उंचीच्या खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात होवू लागले आहेत. भविष्यात मोठा अपघात झाल्यानंतरच ठेकेदाराला व पालिकेला जाग येणार काय, असा सवाल येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
सातार्याला कधी नव्हे असे बांधकाम मंत्रीपद मिळालेले आहे. त्यामुळे सातारा शहरात तसेच जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत, ही आश्वासक बाब असली तरी कधीकधी दिव्याखाली अंधार असतो, त्याचा प्रत्यय सातारा शहरातील नागरिकांना येत आहे. सातारा शहरात अनुक्रमे जुनी भू-विकास बँक चौक ते जुना आरटीओ चौक असा अतिशय देखणा कॉंक्रिटचा रस्ता अल्पावधीतच बांधण्यात आला. सातार्यातील हा कदाचित पहिलाच कॉंक्रिटचा रस्ता तयार झाल्याने तो सातारकरांमध्ये चर्चेचा ठरला. या रस्त्याच्याच बाजूला आकर्षक असे पथदिवे उभे करण्यात आले. त्या पथदिव्यावरच सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या सातारकरांना सुमधूर असे संगीत ऐकण्यासाठी ध्वनीक्षेपक (स्पीकर्स) लावण्यात आले आहेत. परंतू या उलट, सदर बझारामध्ये कुबेर गणेश-कूपर बंगला ते कनिष्क मंगल कार्यालयापर्यंत असाच कॉंक्रिटचा रस्ता बांधण्यात आला आहे. हा रस्ता तयार होवून उणीपुरे दोन महिने उलटले तरी साईड पट्ट्यांना सोडलेल्या जागेमध्ये दीड ते दोन फूट उंचीचा खड्डा तयार झालेला आहे. या रस्त्याला लागूनच अनेक रहिवासी इमारती, बंगले, रुग्णालये, बगिचे आहेत. संबंधितांनी आपापल्यापरिने मुरुम तसेच खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपामध्ये या कॉंक्रिट रस्त्याला जोडरस्ता तयार केलेला आहे. बाकीचा सुमारे सातशे मीटरचा रस्ता मात्र खड्ड्यातच गेला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी सातारा पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतू अद्यापही पालिकेने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिलेली आहे. हा रहदारीचा रस्ता असल्याने अनेक अबालवृद्ध या रस्त्याचा वापर करीत असतात. रस्ता चकचकीत झाल्याने सातार्यातील दुचाकीस्वार यावरुन बेदरकारपणे दुचाकी दामटत असतात. भविष्यामध्ये चुकून एखादी कार अथवा दुचाकी घसरुन या खड्ड्यामध्ये पडली तर मोठी जिवीतहानी घडू शकते. परंतू बांधकाम मंत्र्यांच्या शहरातच अशा पद्धतीची कामे होत असल्याने अनेकांनी याबाबत नापसंती व्यक्त केली आहे.
येणार्या दिवसामध्ये जर याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत तर ठेकेदाराच्या घरावर तसेच पालिकेच्या दारावर मोर्चा काढण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.