मुंबई : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं? असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केल आहे. पुण्यातील मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मागच्या वर्षी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मावळमध्ये बोलताना शरद पवारांपासून दूर होण्याचं कारणही अजित पवारांनी सांगितलं. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, शरद पवारांना उद्देशून असं विधान अजित पवारांनी केलं.
येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईलय 35 दिवसांनी मतदान होईल, असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.