अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारा वसईतील तरुण अभिनेता तथा दिग्दर्शक आयुष भिडेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय.. नीरजा वर्तक लिखित ‘घोर’ आयुष दिग्दर्शित दीर्घांक नाट्याचे नाव आहे. या नाटकाचा पाचवा प्रयोग २५ तारखेला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यागृहात रात्री ८ वाजता रंगणार आहे. यापुर्वीच्या चार प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्यामुळे आयुष आणि त्याची टिम पाचव्या प्रयोगासाठी उत्साहीत झाली आहे.
यापुर्वी आयुषने अनेक मालिका आणि नाटकांतून पारितोषिके पटकावली आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत त्याची लकी ही भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. आता आयुष ‘घोर’ या दिर्घांकाद्वारे दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदारीतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. घोर हा सुन्न करणारा आणि जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा दीर्घांक आहे. लेखन,दिग्दर्शन,अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर सक्षम ठरणाऱ्या या दीर्घांकातील गूढतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यश मिळवले आहे. आयुष यात अघोरीची भूमिका साकारत आहे.
आयुषसह या नाटकात नीरजा वर्तक आणि सायली गावंड यांनी महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. या कलाकारांच्या अभिनयासह ‘घोर’ ची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम आहे. कैलास ठाकूर यांची प्रकाशयोजना, शरद विचारे ह्यांची रंगभूषा,मिहीर जोग यांचे पार्श्वसंगीत,यश जाधव- शुभम जाधव यांचे नेपथ्य,पूर्व फडके-कैलास मेस्त्री ह्यांची रंगमंच व्यवस्था घोर ला जिवंत रुप देते.चिता,पेट घेणाऱ्या चितेचा आवाज,आसमंतात भरुन राहिलेला धूर सगळंच चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारं आहे.नाटकाची ही चळवळ आम्ही रंगकर्मी ह्या समूहाने घोर द्वारे मनापासून सुरु ठेवली आहे,आता गरज आहे ती नाट्यरसिकांच्या साथीची,नाटक बघा नाटक जगवा असे आवाहन आयुष ने केले आहे.