सातारा : बनावट तणनाशक तयार करणार्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजे नाका येथे आठ जुलै रोजी दुपारी चार वाजता सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शाहूपुरी पोलिसांची ही अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे.
दोन लाख सहा हजाराच्या बायर कंपनीच्या बनावट औषधाच्या 260 बॉटल, एक लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो तसेच रेवडी तालुका कोरेगाव फलटण व वडूज येथील कारखान्यातून तब्बल 12 लाखाची बनावट राऊंडअप औषधे जप्त करण्यात आली आहेत धैर्यशील अनिल घाडगे वय31 राहणार साई वैष्णव अपार्टमेंट समता कॉलनी शाहूपुरी,युवराज लक्ष्मण मोरे वय 28 रेवडी तालुका कोरेगाव, गणेश मधुकर कोलवडकर वय 30 राहणार घालवडी तालुका फलटण जिल्हा सातारा,निलेश भगवान खरात वय 38 राहणार जाधववाडी तालुका फलटण,तेजस बाळासो ठोंबरे वय 30 राहणार वडूज तालुका खटाव,संतोष जालिंदर माने वय 45 राहणार नढवळ तालुका खटाव जिल्हा सातारा असे सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना करंजे नाका येथे बनावट तन नाशक औषध विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने करंजे नाका परिसरात आठ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता सापळा रचला करंजे नाका येथे मोळाचा ओढा या बाजूने येणारा एक टेम्पो पोलिसांनी संशयावरून अडवला. गाडी चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धैर्यशील घाडगे असे सांगितले पथकातील कर्मचारी व टू बडी कन्सल्टिंग कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश पिसाळ यांनी गाडीतील औषधे चेक केली असता ती औषधे बनावट असून ती बायर राऊंड अप नावाने विकली जाणार होती. पोलीस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडी चालकासह टेम्पो ताब्यात घेऊन पंचांसमक्ष पंचनामा केला यामध्ये दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे बायर कंपनीचे बनावट औषधाच्या 260 बॉटल व एक लाख रुपये किमतीचा टाटा अपे असा मुद्देमाल जप्त केला. संबंधित संशयित यांच्याकडून अधिक माहिती घेतल्यानंतर रेवडी, फलटण,दहिवडी येथे सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 318 ( 4 )कॉपीराईट कायदा 1999 च्या कलम 63 व 65 नुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ अधिक तपास करत आहेत.
या कारवाईमध्ये सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल शिंदे, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी भाग घेतला होता.