सातारा : महायुतीचे नेते युतीधर्म पाळत नसून रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने प्रचाराच्या माध्यमातून मांडले जात नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
राज्य कार्यकारिणीचे सदस्य संजय भगत, युवा कार्यकारणी अध्यक्ष प्रकाश साबळे, मधुकर जाधव, अनिल बाबर, देवदास जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन हमीभाव कर्जमाफी इत्यादी प्रश्न संदर्भात शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी काही प्रश्नांच्या संदर्भात अजूनही न्याय मिळालेला नाही, याची नाराजी या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. या नाराजीच्या संदर्भाने जिल्हा कार्यकारिणीची साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत राज्य कार्यकारिणी सदस्य संजय भगत यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे निर्देश दिले. जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांना जिल्हा व तालुका पातळीवर योग्य ती संधी दिली जाईल व याबाबत अहवाल रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांना दिला जाईल, असे स्पष्ट केले.
महायुतीचे नेते तसे उमेदवार रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत असल्याची तक्रार व्यक्त झाली होती. ही नाराजी दूर करण्याचा भगत यांनी प्रयत्न केला. याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने प्रचारात मांडले जात नाहीत, अशी तक्रार करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना जिल्हा पातळीवर योग्य ती संधी दिली जाईल, असे ते म्हणाले.