सातारा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत बिजवडी (ता. माण) येथील गायरानावर साकारलेल्या सातारा जिल्ह्यातील तसेच बारामती परिमंडलातील पहिला सौर प्रकल्प (दि. २८ नोव्हेंबर) कार्यान्वित करण्यात आला. महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या ५ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामुळे बिजवडी वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ८ गावातील १४२७ शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. ऊर्जा विभागाच्या अवर सचिव सौ. आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने या योजनेची अंमलबजावणी युद्ध पातळीवर केली. शासनाच्या मालकीच्या पडीक गायरान जमीनीवर ३ ते १० मेगावॅटचे विकेंद्रित सौर प्रकल्प निर्माण करुन तयार झालेली वीज नजीकच्या ३३ केव्ही उपकेंद्राला जोडणे व ती वीज शेतकऱ्यांना दिवसा देणे असे या योजनेचे स्वरुप आहे.
सातारा जिल्ह्यात या योजनेतून २०८ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प होणार आहेत. त्यापैकी बिजवडी (ता. माण) येथील हा पहिला प्रकल्प आहे. मे. मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला याचे कंत्राट मिळाले होते. त्यांनी अल्पावधीतच २५ एकर गायरान जमीनीवर हा प्रकल्प साकारण्याचे काम केले आहे. गुरुवारी (दि. २८) महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंते सागर मारुलकर, हणमंत ढोक, प्रमोद रागीट यांचेसह मेघा इंजिनिअरिंगचे सुरेश शेट्टी आदी उपस्थितीत होते.
८ गावातील १४२७ शेतीपंपाना लवकरच मिळणार दिवसा वीज :
मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेतील बिजवडी येथील ५ मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने बिजवडी ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत ८ गावातील १४२७ शेतीपंपांना लवकरच दिवसा वीज मिळणार आहे. यामध्ये बिजवडी, थदाळे, मोगराळे, पाचवड, हस्तनपूर, अनभुलेवाडी, येळेवाडी, राजवडी या गावांचा समावेश आहे.