सातारा : काही दिवसांमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले असले तरी निवडणुकांमध्ये मश्गुल असणार्या एकाही लोकप्रतिनिधीला बळीराजाच्या बांधावर जाण्याची तसदी घ्यावी वाटत नाही, याबाबत शेतकर्यांमधून संतापाची लाट उसळत असल्याची भावना रयत क्रांती सेनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत प्रकाश साबळे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी रोजच पडणार्या मुसळधार पावसाने उत्तर सातार्यातील शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. त्यात शेतकर्यांना दिवाळी गोड व्हावी, यासाठी हमखास साथ देणारे पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. मात्र, शेतात पाणी असल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक उघड्या डोळ्यांनी बळीराजाला पहावे लागत आहे. त्यातच सोयाबीनचा दर उतरत असल्याने शेतकर्यांच्या डोळ्याचे पाणी थांबण्याचे नाव घेईनासे झाले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यात विधानसभा निवडणुकांची धूम असल्याने लोकप्रतिनिधी आपापले मतदारसंघ वाचविण्याच्या घाईगडबडीत आहेत. मात्र, ज्यांच्या जिवावर आपण ही निवडणूक लढवतोय त्या बळीराजाची अवस्था पाहण्यास त्यांना वेळ नाही, असे दिसत आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे लवकरात लवकर उरकणे गरजेचे असताना त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र संतप्त झाल्याची प्रतिक्रिया साबळे यांनी दिली आहे.