सातारा : नगरपालिकेच्या जागांवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बंद टपऱ्या हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सोमवारी दिवसभरात राधिका रस्त्यावरील आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
सातारा शहरात बंद टपऱ्यांचे अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा संवेदनशील विषय बनला आहे. या गंभीर प्रकाराची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दखल घेत काही दिवसांपूर्वी टपरीधारकांना नोटीस बजावली. बंद टपऱ्या तातडीने काढून घ्याव्यात, अन्यथा त्या जप्त करून दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल असा इशारा दिला. मुदत देऊनही काहीच हालचाल न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करून प्रत्यक्षात कारवाईस प्रारंभ केला.
बाजार समिती, हुतात्मा स्मारक चौक, करंजे नाका येथील टपऱ्या व हातगाड्या जप्त केल्यानंतर सोमवारी या पथकाने आपला मोर्चा राधिका रस्त्याकडे वळवला. सकाळी साडेअकरा वाजता टपऱ्या जप्त करण्याची मोहीम सुरू झाली. दिवसभरात मोठ्या आकाराच्या आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या असून, मंगळवारी देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे निकम यांनी सांगितले. अनेक वर्षांचा अडथळा दूर होऊ लागल्याने शहरातील रस्ते देखील मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.