मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत

by Team Satara Today | published on : 26 December 2024


सातारा : वाई खंडाळा महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले. पुणे बंगळूर महामार्गावर मतदार संघात मकरंद पाटील यांचे जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी शिरवळ येथे मोठ्या उत्साहात अपूर्व स्वागत करण्यात आले. शिरवळ खंडाळा वेळे सुरूर,कवठे, बो, भुईंज, पाचवड टोल नाका सातारा येथून कराड पर्यंत ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.  यामध्ये महिलांचाही आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

पुणे बंगलोर महामार्गावर येताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत फुलांच्या वर्षावात ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना मानाचा फेटा बांधून त्यांची  घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मकरंद पाटील यांच्या जय जय कारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. त्यामुळे अनेकदा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मिरवणुकीत खासदार नितीन पाटील बंधू मिलिंद पाटील ही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाभरातील कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मार्गावर ठिकठिकाणी उभे होते.

शिरवळ येथील स्वागत स्वीकारून मकरंद पाटील सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव येथे गेले. येथे त्यांनी सावित्रीबाईंच्या स्मृतीला अभिवादन केले. नायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांचे येथेही मोठे उत्साही स्वागत केले. सावित्रीबाईंच्या जन्मभूमीला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडणार नाही असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

वाई तालुक्यातील वेळे येथे खंबाटकी घाटातून येतात व इतर वाई महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने उत्साही स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी जेसीबीतून हार लावले होते. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. येथेही कार्यकर्त्यांना आवर घालण्यात पोलिसांना शिकस्त करावी लागली. फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूप राजे खर्डेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते. 

कवठे तालुका वाई येथील किसन जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसनवीर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. येथील ग्रामस्थांनी त्यांची वीस बैलजोडींच्या साहाय्याने बैलगाडी ओढत महामार्गापासून मिरवणूक काढली. या ठिकाणी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांचे बोपेगाव आणि कवठे ती लगतची गावी असल्याने येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह होता.  भुईंज पाचवड आनेवाडी टोल नाका वाढे फाटा व विसावा नाका सातारा येथे सातारा शहरातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सातारा पोलिसांना गर्दी आवरताना खूप शिकस्त करावी लागली. कार्यकर्त्यांना ही पोलिसांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सातारा शहरातील व जिल्ह्यातील  विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. येथून मकरंद पाटील कार्यकर्त्यांच्या मोठ्या ताफयातून कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी रवाना झाले. पालकमंत्री म्हणून वरिष्ठ तो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असे मकरंद पाटील यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने वाई महाबळेश्वर व पाटण चावली तालुक्यात रस्ते पूल शेती घरे जनावरे व माणसे वाहून मोठे नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणी पुनर्वसनाची कामे रस्त्याची व पुलांची कामे करून मार्ग पूर्ववत करण्यात आले आहेत. वाहून गेलेली शेती पुनर्जीवित करण्यात आली आहे. घरांचे आणि मनुष्यबळाच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्यात आली आहे. यापुढे उर्वरित पुनर्वसनाची व मदतीची कामे पूर्ण केली जातील. सातारा जिल्ह्याच्या सर्वजण समन्वयाने विकास करू. - मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे

संबंधित बातम्या