कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन ते सातारा राज्य मार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात मृत झालेल्यांची नावे सागर लालासो माने (वय २९, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) व किशोर नंदू कदम (वय ४०, रा. सोमनाथ जळगाव, ता. जि. जालना) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माने हे एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच ११ डीएल ५६६४) वरून सातारा बाजूने आपल्या घरी येत होते. त्याचवेळी वाठार स्टेशनकडून किशोर कदम हे मोटरसायकल (क्र. एमएच २० एफक्यू ७४४३) वरून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दोन्ही मोटरसायकलींची पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघेही जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील पंढरीनाथ माने यांनी याबाबत वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाठार स्टेशन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.