सातारा : वर्षानुवर्षे बंद असलेल्या टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दुपारी बाराच्या दरम्यान दोन तास कारवाई करून दहा टपऱ्या जप्त केल्या. बंद टपऱ्यांच्या विरोधात अधिसूचना काढूनही काहीच हालचाल न झाल्याने पालिकेने कठोर पावले उचलले आहे.
सातारा शहरांमध्ये बंद टपऱ्यांचे अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. सातारा पालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये सुद्धा पार्किंग व इतर विकासाच्या दृष्टीने जागा शिल्लक नाही. बहुतांश जागांमध्ये टपऱ्यांची अतिक्रमणे हा शहराच्या दृष्टीने विद्रूपीकरणाचा विषय आहे. आठ दिवसापूर्वी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी बंद टपऱ्या तातडीने काढून घेतल्या जाव्यात, संबंधित मालकांनी याची गंभीर दखल घ्यावी, या टपऱ्या न हटवल्यास या टपऱ्या जप्त करून त्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात येईल, अशी गंभीर सूचना प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली होती. संबंधित टपरीधारकांना मुदत देऊनही काहीच हालचाल न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.
पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम आणि पालिकेचे 15 कर्मचारी दोन डंपर सह येथील हुतात्मा उद्यान चौकात दाखल झाले. चौकापासून थेट पोवई नाक्यापर्यंत दोन तास कारवाई करत बंद टपऱ्या उचलण्यात आल्या. काही टपरी चालकांनी मध्यस्थी करून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र निकम यांनी कठोरपणे कारवाई सुरू ठेवत टपऱ्या जप्त करत पालिका आता थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व जप्त टपऱ्या हुतात्मा उद्यान येथील अग्निशमन केंद्राच्या परिसरात जमा करण्यात आल्या आहेत. संबंधित टपरी चालकांकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बुधवारी करंजे परिसरातील बंद टपऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले आहे.