थोरल्या पवारांचे डावपेच, की फडणवीसांची मुत्सद्देगिरी ?

सातारा जिल्हा बालेकिल्ला कोणाचा ?

by Team Satara Today | published on : 21 November 2024


सातारा : महाराष्ट्रातील 288 जागांची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणीच्या निकालाचा सट्टेबाजार राज्यात गरम झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असणारा सातारा जिल्हा बालेकिल्ला महायुतीचा, की महाविकास आघाडीचा? या प्रश्नावर आता चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषकांचे अंदाज आणि एकूण समोर येणारी आकडेवारी पाहता सातार्‍यात महायुती आघाडी घेईल, असे चित्र आहे. काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी सुद्धा गणिते पालटू शकेल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचे डावपेच यशस्वी होणार, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचा कस लागणार यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

कराड उत्तर, कराड दक्षिण, माण-खटाव, पाटण आणि कोरेगाव या पाच मतदारसंघांमध्ये 70% हून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे येथे परिवर्तन घडणार, असे संकेत मिळत आहेत. कोरेगाव मध्ये आमदार महेश शिंदे विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे असा सामना मुद्दा आणि गुद्दा अशा दोन्ही ठिकाणी रंगला. त्यामुळे येथे निर्णायक कौल कोणाचा याची चर्चा आहे. कराड उत्तर मध्ये परिवर्तन होणारच, अशा आवेशात भाजपा असून मनोज घोरपडे हे भावी आमदार असू शकतील, असे संकेतच उदयनराजे यांनी दिले आहेत. कराड दक्षिण मध्ये अतुल भोसले यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा घेतल्या, तर महायुतीच्या फलटण उमेदवारासाठी अजित दादांनी तेथे दोन सभा घेतल्या. यंदा कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांना आमदारकी मिळणार, अशी चर्चा असून येथे वातावरण निर्मिती करण्यात भाजपने सामूहिक यश मिळवले आहे.

महाविकास आघाडीच्या तुलनेने महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी गट बाजूला ठेवून एकीने प्रचार केल्यामुळे वातावरण फिरू शकेल, असा अंदाज आहे. एकेकाळी शरद पवार यांचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा सध्या महायुतीकडे खेचला जातोय, असे चित्र आहे. राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा सातार्‍यात बांधणी सुरू केली आहे. फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने पवारांच्या कौशल्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पवारांनी वाईमध्ये कौशल्याने डाव टाकत बावधनच्या पिसाळ घराण्याकडे वाईची जबाबदारी सोपवली, तर पाटणमध्ये हुकमी पाटणकर सरदारांना अपक्ष फॉर्म भरायला लावून तेथे तिरंगी लढत होईल, याची चाणाक्ष खेळी केली. सातार्‍यात भाजपच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असल्याने येथे पवारांनी कोणतीही राजकीय रिस्क घेतली नाही. फलटणमध्ये रामराजे गट आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. तेथे अजितदादांनी सचिन कांबळे पाटील यांना ताकद देत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी सख्य वाढवले आहे. त्यामुळे फलटणमध्ये सुद्धा एका अर्थाने पवार विरुद्ध पवार अशीच लढत होत आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा या सर्वात मोठ्या मतदारसंघांमध्ये आमदार मकरंद पाटील यांना सोपी लढत नाही. कारण खंडाळ्यात पोहोचण्यामध्ये आबांची यंत्रणा यशस्वी झाली तरी रामराजेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे येथील वर्चस्व आणि तालुक्याच्या अस्मितेसाठी पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष केलेली लढाई यामुळे खंडाळ्यात मत विभागणी होऊन तेथे फटका कोणाला बसणार, हा खरा विषय आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मकरंद आबा यांनी चांगली मोर्चेबांधणी केली. मात्र मुख्यमंत्री गटाचे शिलेदार आबांच्या पंक्तीमध्ये दिसले नाहीत. पाटण मतदारसंघांमध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची प्रतिष्ठा पणाला आहे. तेथे सरकारविरुद्ध साहेब यांच्या लढतीला शिवसेनेच्या हर्षद कदम यांच्या उमेदवारीचा तिसरा कोन आहे. अपक्ष उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होऊन त्याचा फायदा पाटणकर यांना मिळेल, अशी खेळी पवारांची आहे.

माण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमचं ठरलंयचौकडीने जोरदार लढत दिली. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, प्रभाकर देशमुख यांची साथ मिळाली आहे. तरीसुद्धा माण तालुक्यात आमदार जयकुमार गोरे यांच्या झंजावातील सभा चर्चेच्या ठरल्या आहेत. गेले तीन टर्म आमदार जयकुमार गोरे येथून आमदार असून यंदा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. शरद पवारांना सुद्धा येथे परिवर्तनाच्या अपेक्षा आहेत. मात्र आमचं ठरलंय समूहाच्या अति महत्वकांक्षा राष्ट्रवादीला अडचणीच्या ठरू शकतात, असे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी नेस्तनाबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या दृष्टीने उमेदवार निवड आणि राजकीय सभांचे नियोजन केले होते, तर शरद पवारांनी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी 40 जागांवर आपले राजकीय कौशल्य पणाला लावले आहे. एकूणच सातारा जिल्हा महायुतीचा की महाविकास आघाडीचा बालेकिल्ला? या प्रश्नाचे उत्तर 23 तारखेला मिळणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युक्रेनवर मोठा हल्ला

संबंधित बातम्या