नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अनेक मुदद्यांवर यंदाचे अधिवेशन गाजले आहे. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला जात आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
संसदेच्या पायऱ्यावर अनेकदा विरोधकांकडून जोरदार निदर्शने केली जातात. तसेच धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी देखील केली जाते. विरोधातील सर्व खासदार या पायऱ्यांबसून आंदोलने करत असतात. मात्र यामुळे सत्ताधारी खासदारांना प्रवेश करता येत नाही. यामुळे अनेकदा शाब्दिक चकमक देखील होत असते. मात्र राहुल गांधी यांच्यामध्ये आणि सत्ताधारी खासदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये धक्काबुक्की देखील झाली. देशाच्या महत्त्वाच्या संसदीय पायऱ्यावर हा प्रकार झाल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी यापुढे संसदेच्या पायऱ्यावर आंदोलनं करण्यास बंदी घातली आहे.
धक्काबुक्कीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही पक्षाला संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करता येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा खासदारांना कोणत्याही प्रकारचे धरणे आंदोलन किंवा निदर्शन करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले जावे याकरिता संसदेच्या पायऱ्यांवरील आंदोलनांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्देशांनंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले होते. कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसह राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये विरोधकांचे आंदोलन सुरु होते. मात्र धक्काबुक्की झाल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात पोलीस तक्रार देखील करण्यात आली आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे. मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत,” असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे.