सातारा : सासपडे, ता. सातारा येथील तेरा वर्षीय आर्या सागर चव्हाण या अल्पवयीन युवतीची राहुल यादव या नराधमाने निर्घृण हत्या केली या नराधमाचा खटला जलद गती न्यायालयात चालवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली जावी या मागणीसाठी साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला. मराठी क्रांती मोर्चा व सासपडे ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले.
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. सासपडेच्या दुर्दैवी आर्या विषयी या मोर्चामध्ये सहानुभूती व्यक्त झाली व राहुल यादव या नराधमाविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चामध्ये गावातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते या मोर्चाला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली आर्याला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला तत्काळ फाशी दिलीच पाहिजे, अशा घोषणा देत हजारो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामस्थांच्या वतीने एक शिष्टमंडळ व आर्याच्या पालकांनी नागेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व या नराधमाचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा तसेच निकिता राजेंद्र पवार ही 19 वर्षे वयाची युवती अशाच पद्धतीने बेपत्ता झाली होती .तिचाही अत्याचार करून खून झाल्याचा ग्रामस्थांना संशय आहे त्या दृष्टीने सुद्धा सदर नराधमाचा तपास करण्यात यावा या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येऊन पूर्वीच्या प्रकरणात बोरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी होते त्यांची सुद्धा कसून चौकशी व्हावी अशा विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत .या आरोपीस जलद गती न्यायालयात केस चालवून त्याचा निकाल दिला जावा आणि त्याला तत्काळ फासावर लटकवावे शिवाय आर्याच्या पालकांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सासपडे ग्रामस्थांनी जिल्हा बार असोसिएशनला कोण त्याही वकिलाने या आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी विनंती करणारे निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर आनंदराव कणसे, सुवर्णा पाटील, तात्या सावंत, ऍड. उमेश शिर्के, वैभव चव्हाण, प्रकाश भोसले, भगवान कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.