सातारा : राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची महाराष्ट्राची गौरव रथयात्रा दि. 25 एप्रिलपासून कराड येथून सुरु झाली आहे. ती आज राजधानी सातार्यात पोहचली. त्या रथयात्रचे स्वागत ढोल, ताशांच्या गजरात सातार्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले. दरम्यान, छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर या गौरव रथयात्रेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सातार्यात या गौरव यात्रेचे कलश पुजन झाल्यानंतर ही यात्रा वाईकडे मार्गस्थ झाली. कवठे (ता. वाई) येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. कवठे येथे देशभक्त किसन वीर आबा यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुढे ही यात्रा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 25 पासून गौरवयात्रा सुरु झाली आहे. ही रथयात्रा कराड येथून निघाली होती. या रथयात्रेत मदत, पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने महाराष्ट्रात गौरव रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरुवात 25 एप्रिलपासून करण्यात आली आहे. ही ही गौरवयात्रा महाराष्ट्रातल्या सहा विभागातून मुंबईच्या दिशेने जाणार आहे. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. सातारा जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालिन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. त्या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच 65 वर्षात ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, त्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या रथयात्रेत धार्मिक स्थळांच्या ठिकाणची माती, छ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोटांच्या ठिकाणची माती, नद्याचे जल एकत्र करुन कलश मुंबईकडे रवाना होत आहे.