कराड : रयत माऊली यांचे आयुष्य म्हणजे एक महाकाव्यच आहे. आपल्या पतीच्या शिक्षणकार्यात त्या एकरूप, समरस झाल्या. विद्यार्थ्यांच्याविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. अण्णांच्या सानिध्यात त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल झाले. रयत माऊलींच्या त्यागावरच ही संस्था उभी राहिलेली आहे, असे प्रतिपादन प्राध्यापिका सौ. अनिता साळुंखे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या विद्यानगर ता. कराड येथील सद्गुरुर गाडगे महाराज महाविद्यालयात ‘रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने हे होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.रमेश पोळ, प्रा. डॉ. यु. बी. मोरे, उपप्राचार्या माधुरी कांबळे, उपप्राचार्य प्रा. सुरेश नांगरे. प्रा. डॉ. ए. के पाटील इत्यादी उपस्थित होते.
प्रा.अनिता साळुंखे म्हणाल्या, रयत माऊली लक्ष्मीबाईंनी निस्वार्थ सेवेने रयत शिक्षण संस्थेसाठी आपले आयुष्य समर्पित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. डॉ.मोहन राजमाने म्हणाले, रयत माऊली लक्ष्मीबाईंनी कर्मवीर अण्णांना खूप चांगली साथ दिलेली आहे. रयत माऊलींच्या कार्यासंबंधी चिंतन केले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेसाठी बहुजन समाजासाठी त्यांनी केलेले कार्य मौलिक असे आहे.
प्रास्ताविक प्रा.डॉ.दिलीपकुमार कसबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी केले. आभार प्रा.डॉ.सचिन जाधव यांनी मानले.