मुंबई : आम्ही आणलेल्या योजनांवर टीका करायची आणि त्याच योजना चोरून आपल्या जाहीरनाम्यात मांडायच्या, ही महाविकास आघाडीची पद्धत आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री नव्हे, ती तर थापासूत्री आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपर हिट झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशीही टीका त्यांनी केली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी गोखलेनगरमध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, कसब्याचे उमेदवार हेमंत रासने, हडपसरचे उमेदवार चेतन तुपे आदींसह महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळातील कामे आणि महायुतीच्या काळातील कामांची तुलना केली, तर त्यांनी केवळ स्थगिती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारची नोंद विकासविरोधी सरकार म्हणून होते. त्यांनी अडीच वर्षांत सिंचनाच्या केवळ चार प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही सव्वादोन वर्षांत सिंचनाच्या 124 प्रकल्पांना मान्यता दिली. ते सत्तेवर आल्यानंतर आमच्या योजनांची चौकशी करणार, अधिकार्यांवर कारवाई करणार, असे म्हणत आहेत. त्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. लाडक्या बहिनींसाठी एकनाथ शिंदे हजार वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. विरोधक आचारसंहितेचा बागुलबुवा करतील म्हणून आम्ही आक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे जमा केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार एका विचाराचे असल्यावर काय चमत्कार होतो, ते आपण पाहिले. राज्यातील सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणि आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होऊ नयेत,
पुणे शहर वाहतूक कोंडीमुक्त व्हावे, यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यावर फार प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच वेळी मंत्री केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचीही भाषणे झाली.