आठवड्याला स्कूल बसचालकांची होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय

by Team Satara Today | published on : 09 June 2025


मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची चाचणी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस होणे गरजेचे आहे. तसेच शाळांनी अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खाजगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये केली आहे. चालकांची पार्श्वभूमी, ज्यामध्ये बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघातांची प्रकरणे समाविष्ट आहेत. वाहतुकीदरम्यानविद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांसाठी लागू केलेल्या निर्णयात नवीन नियम समाविष्ट आहेत.

खासगी वाहतूक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती दिली पाहिजे. याव्यतिरिक्त, पालकांनी सुरक्षिततेच्या उद्देशाने चालकांची वैयक्तिक माहिती राखली पाहिजे, बसेसना जीपीएस बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, बसची तांत्रिक तपासणी दर सहा महिन्यांनी करून आरटीओ कडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांनी शौचालये, परिसर इतर संवेदनशील ठिकाणी देखील देखरेख ठेवावी. शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शिल्लक राहणार नाही याची खात्री शाळांनी करावी.

मुंबईत सध्या सुमारे ६,००० शालेय बस कार्यरत आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित झाली असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या वेळेस सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल.”

विद्यार्थीसंख्या आसनक्षमतेएवढीच

शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आसन क्षमतेपुरतीच मर्यादित ठेवावी.

प्रत्येक बसमध्ये एक महिला सेविका अनिवार्य

पालकांची संमती नसताना विद्यार्थ्यांना शाळेतून सोडू नका

स्कूल बस चालक, क्लीनर आणि महिला अटेंडंटची ड्रग्ज आणि अल्कोहोल तपासणी

स्कुलबसमध्ये खासगी प्रवासी नसल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी

सरकारने सर्व शाळांना एक अलर्ट सिस्टीम स्थापित करण्याच्या सूचना केल्या आहेत. जेणेकरून एखादा मुलगा शाळेतून हरवला किंवा त्यांच्या बसमध्ये चढला नाही तर त्यांना तत्काळ सूचना मिळतील. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या जीआरनुसार, शाळा व्यवस्थापनाने बसमध्ये जीपीएस बसवणे आणि वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे यासह अतिरिक्त सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करावी. जीआरमध्ये महिला बस चालकांच्या भरतीला देखील प्रोत्साहन दिले आहे, असे अर्ली चाइल्डहुड असोसिएशनच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स म्हणाल्या. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केल्याने मुलांची सुरक्षितता आता अधिक ठळक होणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील घाट रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
पुढील बातमी
माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे

संबंधित बातम्या