आरटीई प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ

पालकांना दिलासा : २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया

by Team Satara Today | published on : 03 March 2025


सातारा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बालकांचे प्रवेश निश्चित झालेल्या जागांवर प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश १० मार्चपर्यंत निश्चित करता येणार आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २२१ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. १ हजार ९२८ जागांसाठी ४ हजार ७८० विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले होते. सोडतीत जिल्ह्यातील १ हजार ८३२ जणांना लॉटरी लागली. सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लघुसंदेशही पाठवण्यात आले. त्यानुसार पालकांनी त्या-त्या शाळेत जावून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. आरटीई प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

 

निवासाचा पत्ता ग्राह्य धरण्याची सूचना

प्रवेश प्रक्रियेत बालकांच्या पालकांनी शाळा निवडलेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वत:च्या मालकीचे घर नसेल, परंतू पालकांकडे निवासी पुरावा म्हणून ते राहत असलेल्या ठिकाणाचे रेशनिंग कार्ड, वाहन परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा त्या ठिकाणाचा असेल तर तो निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरावा. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास पालक राहत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून खात्री करावी, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निधीच्या कारणामुळे कृषिमित्र बेरोजगार
पुढील बातमी
सातारा पोलिसांचा व्हॉलिबॉल स्पर्धेत डंका

संबंधित बातम्या