मुंबई : हल्ली सण-उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी सर्रासपणे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. पण आता महायुती सरकारने मराठीचं वापरलं पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. याबद्दलचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
परिवहन विभागाकडून नवीन आदेश काढण्यात आले आहे. 'महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेले असतात. (उदा . बेटी बचाव बेटी पढाव) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारवर बंधनं येतात. या पुढे असे सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास ( उदा . मुलगी वाचवा..मुलगी शिकवा..!) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
तसंच, 'मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरू करावी, तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.