सातारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शाहू चौकातील अर्धकृती पुतळा कोठे ठेवण्यात आला आहे? हा पुतळा स्थलांतरित करताना त्याचा अवमान झाला आहे, असा आरोप करत मातंग समाज कृती समितीचे गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करण्यात आले आहे. गणेश वाघमारे यांनी या प्रकरणामध्ये हा पुतळा मुख्याधिकाऱ्यांनी कोठे स्थलांतरित केला, याचा अद्याप खुलासा केलेला नाही. जिल्हा प्रशासन सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही. या प्रकरणातील नियंत्रक अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी आहे. अर्धकृती पुतळा कोठे स्थलांतरित केला अथवा कोणत्या संस्थेला दिला, याचा खुलासा करण्याची कृती समितीची मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास यापुढेही या आंदोलनाची तीव्रता अशाच पद्धतीने वाढवणार असल्याचा इशारा गणेश वाघमारे यांनी दिला आहे.