भारत-पाक युद्धातील रणगाडा सुभाषचंद्र बोस चौकात स्थानापन्न

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रात्री केली पाहणी

by Team Satara Today | published on : 23 February 2025


सातारा : भारत-पाक युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला टी 55 रणगाडा सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये बसवण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री केली. यावेळी एडवोकेट विनीत पाटील आणि उदयनराजे समर्थक उपस्थित होते. या रणगाड्यामुळे सातारा शहराच्या सौंदर्याला वेगळे परिमाण मिळाले आहेत.

सातारा जिल्हा हा जसा क्रांतिकारकांचा तसा लष्करी सेवेत सहभागी असणार्‍या जवानांचा जिल्हा आहे. ही लष्करी ओळख आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय लष्कराकडे रणगाडा देण्यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला होता. तसेच या रणगाड्यासाठी येथील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये विशेष जागेची व्यवस्था करण्यात आली. दौलत नगर करंजे ग्रामीण आणि सदर बाजार या भागांना जोडणार्‍या सुभाषचंद्र बोस चौकामध्ये टी 55 रणगाडा रात्री उशिरा बसवण्यात आला. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. एका अवजड क्रेनच्या सहाय्याने टी 55 हा रणगाडा चौकाच्या मधोमध बसवण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या चौकात बसवलेल्या रणगाड्याचे सोमवार दिनांक 24 रोजी विशेष कार्यक्रमात अनावरण होणार आहे.

सातारा शहरामध्ये सातारा सैनिक स्कूल तसेच रायगाव येथील छाबडा मिलिटरी स्कूलमध्ये दोन रणगाडे यापूर्वीच बसवण्यात आले आहेत. मात्र त्यांची रचना शाळांच्या अंतर्गत भागात आहे. सध्या बसवण्यात आलेल्या टी 55 रणगाड्याला मात्र सातारकर येता जाता पाहू शकणार आहेत. या रणगाड्यामुळे सुभाषचंद्र बोस परिसराला विशेष शोभा आली असून सातारा शहराची तसेच जिल्ह्याच्या लष्करी परंपरेची ओळख नव्याने वृद्धिंगत होणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सातारकरांना विशेष प्रतीक्षा आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हैशींच्या वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
अजिंक्यतारा किल्ला परिसरातील वनसंपदा वनव्यामध्ये होरपळली

संबंधित बातम्या