सातारा : मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्यावतीने सातारा येथील शिवतीर्थावर बुधवारी दुपारी भर पावसात पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला प्रदेश सदस्य समिंद्रा जाधव, विजय बोबडे, अतुल शिंदे, शिवराज फाळके, प्रताप जगदाळे, इस्माईल मुल्ला, अझर मनेर, नाथाजी बाबर, प्रथमेश पवार, अनिल बडेकर, भानुदास भोसले, सचिन जाधव, सुशांत जाधव, तुषार परीट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली.
शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही... खोकेवाल्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही... पुतळा नव्हे स्वाभिमान कोसळला... फक्त समुद्र नव्हे महाराष्ट्र खवळला..., राजे आम्हाला माफ करा पण बेईमान गद्दारांना साफ करा... असे फलक निदर्शकांनी हाती घेतले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात सातारा शहर पोलीस कर्मचारी व काही प्रसारमाध्यमाने रस्त्यावर गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या राजधानीतच घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महापूर उसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ आंदोलन
by Team Satara Today | published on : 28 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा