पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता

केंद्र सरकारच्या अकराव्या वर्षपूर्ती निमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 14 June 2025


सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा पारदर्शी कारभार करत अकरा वर्ष केंद्रात पूर्ण केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर नवीन उंची देण्याचा प्रयत्न असून नुकतेच भारताने जपानला मागे टाकून देशातील चौथ्या क्रमांकाच्या महासत्तेचे उद्दिष्ट गाठले आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे पदाधिकारी रामकृष्ण वेताळ, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा विधानसभा मतदारसंघाचे संयोजक अविनाश कदम, भाजपचे माजी शहराध्यक्ष विकास गोसावी इत्यादी उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी व देशाला नवीन जागतिक उंची देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची केंद्रात अकरा वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा अनुभव दिला आहे. मोदी सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या, अर्थव्यवस्था मजबूत केली, तंत्रज्ञान सर्व सामान्य पर्यंत पोहोचवले, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी प्रवृत्तीचा बीमोड केला, हिंसाचाराला घरात घुसून मारले जाईल, हेच मोदी सरकारने दाखवून दिले आहे. याशिवाय भारताचे संरक्षण करणार्‍या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संरक्षक प्रणाली, सर्वसामान्य जीवनाच्या सुखकर जीवनासाठी कालबद्ध कार्यक्रमाची वचनबद्धता, देशातील 96 नक्षलवादी जिल्ह्यांमध्ये विकासाचा नवा प्रवाह अशी आश्वासक पावले मोदी यांनी टाकत भारताला अडचणीचे ठरणारे 370 कलम रद्द करून विरोधकांना एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक लगावला आहे.भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. जगात होणार्‍या एकूण डिजिटल व्यवहारापैकी 49 टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात. भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 825 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे. देशात होणार्‍या यूपीआय व्यवहारांची उलाढाल 24 लाख कोटीपर्यंत पोहोचली आहे. देशातील 16 कोटी जनता मोबाईल वापर करते आहे, तर देशात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 97 कोटी वर पोहोचली आहे. हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. जी एम पोर्टल, सरकारी योजनांचे लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना पोहोचवणे, चांद्रयान मोहिम 3 यशस्वी करणे, पायाभूत सुविधांची मजबूतता अशा विविध माध्यमातून केंद्र शासनाने सर्वसामान्यांचे मन जिंकले आहे. भारतात 136 वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या आहेत. ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारने लक्ष दिले आहे. त्या राज्यांसाठी 44 हजार कोटींच्या विकास योजना राबवल्या गेल्या आहेत. महिलांना सैनिकी शाळांमध्ये व एनडीए मध्ये प्रवेश देण्यात येत असून महिला सैनिक देशाच्या संरक्षणासाठी उभ्या आहेत. देशात आयुर्विज्ञान संस्थांची संख्या 23 वर गेली आहे, तर आठ नव्या इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सुरू झाले आहेत. 490 विद्यापीठांची देशात घोषणा झाली असून दीड कोटी युवकांना कौशल्य निश्चित विकास कार्यक्रम दिला जात आहे.
सातार्‍यातील पुलांचे टेक्निकल ऑडिट करण्याच्या सूचना देणारपत्रकार परिषदेत भुईंज, पाचवड पुलांना बसण्यात येणार्‍या हादर्‍यांबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना छेडले असता ते म्हणाले, पावसाळ्याच्या आधी पुलांचे टेक्निकल ऑडिट केले जाते. मात्र संबंधित पुलांचे ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात येतील. यंदा पावसाळा जास्त आहे. त्यामुळे पुलामुळे कोणताही धोका होणार नाही याची खबरदारी आपण नक्की घेवू, असेही त्यांनी सांगितले.
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणारपुणे-बेंगलोर रस्त्याच्या विकसनाचे काम सहा वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप सुरूच आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपडेट दिली आहे. पुणे-सातारा रस्त्याच्या विकसनाचा स्वतंत्र एकदा डीपीआर बनवून त्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण आणि विकसन केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यासंदर्भात त्यांची भेट घेतली असून या कामाला लवकरच गती दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.आनेवाडी टोल नाक्यापासून सातारकरांना मुक्ती केव्हा मिळणार ? या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून 121 किलोमीटरचा महामार्ग गेला आहे. मात्र दुर्दैवाने सातारा जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरण कामासाठी दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले नाहीत. टोलमुक्ती देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत. केंद्र सरकारच्या या प्रकल्पांसाठी ज्या बँका वित्त पुरवठा करतात त्यांना अनामत हमी द्यावी लागते. तसेच केंद्र सरकार व ठेकेदार रिलायन्स इन्फ्रा यांच्यामध्ये काही तांत्रिक वाद सुरू आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तांत्रिक अडचणी सुटल्यानंतर पुणे सातारा रस्त्याचा स्वतंत्र नियोजन प्रकल्प बनवून त्या दृष्टीने रस्त्यांचे विकसन केले जाईल आणि महामार्गाच्या सर्व सुविधा दिल्या जातील. त्यामध्ये कदाचित टोलमुक्तीचा विषय होऊ शकतो, असे आश्वासन दिले आहे. खंडाळा तालुक्यातील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्यावरून सातारा येतानाचा बोगदा लवकरच सुरू केला जाईल. या संदर्भातही गडकरी यांनी खात्री दिल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश
पुढील बातमी
यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार

संबंधित बातम्या