मुंबई : राज्यात प्रामुख्याने सौर ऊर्जेमुळे पारंपरिक ऊर्जेच्या परिवर्तनाचा वेग वाढला आहे. येत्या पाच वर्षांत वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेत आणखी ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेची राज्यात भर पडणार आहे. यासह सौर ऊर्जेच्या विविध योजनांमुळे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक तसेच सात लाखांवर रोजगारांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळासाठी बेरोजगार महिला व युवकांना प्रशिक्षण देणे व त्याचा वेग वाढवत नेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नाशिक येथे बुधवारी (दि. १८) व्यक्त केले.
महाराष्ट्र सौर कौशल्य कार्यक्रम अंतर्गत महावितरण, आशियाई विकास बँक व मिटकॉन यांच्या संयुक्त सहकार्याने एकलहरे (नाशिक) येथील मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रामध्ये सौर कौशल्य प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालकप्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती.
महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) असलेल्या ५७ युवतींना या प्रशिक्षणात प्रथम संधी देण्यात आली आहे. सहा दिवसीय प्रशिक्षणात त्यांना प्रामुख्याने सौर पॅनेल बसवणे, दुरुस्ती करणे, नियमित देखभाल व इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधला. सौर कौशल्य प्रशिक्षणाच्या राज्यातील पहिल्या तुकडीमध्ये सर्वच प्रशिक्षणार्थी म्हणून महिलांना संधी देण्यात आली याचा त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. भविष्यात हरित ऊर्जेची गुंतवणूक व रोजगाराच्या संधी वेगाने वाढत जाणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी आशियाई विकास बँक, महावितरण व मिटकॉन यांचा संयुक्त प्रशिक्षणाची योजना अतिशय स्वागतार्ह आहे असे त्यांनी सांगितले.
श्री. लोकेश चंद्र म्हणाले, राज्यात विजेची स्थापित क्षमता सध्या ३६ हजार मेगावॅट आहे. त्यात सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यात सौर ऊर्जेचा सर्वाधिक वाटा राहणार आहे. जगातील सर्वांत मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून पूर्णत्वास जात आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेद्वारे दिवसा वीजपुरवठा मिळविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. यासोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप आदीमुळे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.
संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणकडून पहिल्या टप्प्यात ४ हजार जणांना सौर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात किमान ३० टक्के महिला प्रशिक्षणार्थींचे प्रमाण असेल असे नियोजन आहे. सोबतच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना सौर कौशल्य प्रशिक्षण देण्यास वेग देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशियाई बँकेचे सल्लागार प्रद्योत मुखर्जी यांनी केले. मिटकॉनचे उपाध्यक्ष श्री. अभय कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) श्री. अरविंद भादिकर, मुख्य अभियंता सुंदर लटपटे, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सौ. शिल्पा फसे यांनी केले.