सातारा : सोनगाव कचरा डेपो परिसरातील पत्रावळी बनविणाऱ्या कारखान्याला शनिवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर पत्रावळ्या जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.
दरम्यान, तालुका पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते. आग लागण्याचे नेमके कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरू आहे.