सातारा : जळगाव ता.सातारा येथील निलेश जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सिव्हील व पोलिस मुख्यालय येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला. खूनाचा गुन्हा दाखल करुन सर्व संशयितांना अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने दोन्ही ठिकाणी तणावा निर्माण झाला.
निलेश जाधव यांना शनिवारी प्रेमप्रकरणातून वाहन धडकवून गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जाधव कुटुंबिय, नातेवाईक संतप्त बनले. सोमवारी सकाळी सिव्हील रुग्णालयात त्यांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. सुमारे १ तासाहून अधिक काळ तेथे पोलिस त्यांना समजावून सांगत होते. तसेच पोलिसांनी शनिवारपासून कायदेशीर प्रक्रिया जी केली आहे त्याची सर्व माहिती कुटुंबियांना दिली. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता.
यानंतर हा जमाव पोलिस मुख्यालयसमोर आला. मुख्यालयासमोर जमावाने धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस अधीक्षक यांना भेटल्याशिवाय व मारेकर्यांना पकडल्याशिवाय तेथून हलणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिस अधीक्षक कार्यालयात नसल्याने जमाव उन्हात बाहेरच थांबून राहिला. तोपर्यंत पोलिस अधीक्षकांचे वाहन तेथे आल्यानंतर शिष्टमंडळ पोलिस अधक्षीक यांना भेटले. तेथे चर्चा झाल्यानंतर जमाव शांत झाला व तेथून निघून गेला.