सातारा : वयाचा आणि आजारांचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. अवघ्या पंचविशीत हृदयविकाराचा झटका आणि चाळिशीत मोतीबिंदूचे ऑपरेशन हे बदलत्या खानपान आणि जीवनशैलीचा परिणाम आहे. शरीराला जडलेल्या आजाराचा स्वीकार केला, तर त्यावर तातडीने उपचार घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी केले.
येथील सातारा क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ये दिल का मामला है' या संवाद कार्यक्रमात डॉ. साबळे बोलत होते. विचारमंचावर पोटविकार तज्ज्ञ डॉ. प्रतापराव गोळे व प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. कमलेश पिसाळ यांची उपस्थिती होती. सातारा येथे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे आणि पोटविकार तज्ज्ञा डॉ. प्रतापराव गोळे यांच्याशी संवाद साधताना अॅड. कमलेश पिसाळ, जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात क्लब सदस्यांसह सातारकर उपस्थित होते.
डॉ. प्रतापराव गौळे म्हणाले, वयाच्या साठीपर्यंत घर, गाडी, परदेश सहल करण्याची नियोजन असणारी पिढी आता अस्तित्वात नाही. आयुष्याची गती तरुणाईने इतकी वाढवली आहे की, तिशीत असताना साठीचे यश मिळवायचे आहे. हे यश मिळवताना आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही मोठी हानिकारक बाब त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी कुठे थांबावे हेही आता ठरवता आले पाहिजे.
डॉ. साबळे म्हणाले, वैद्यकीय तज्ज्ञांनी आजार सांगितल्यानंतर है आपल्याला होणे शक्य नाही, असे म्हणण्यापेक्षा यावर उपाय काय, हा प्रश्न विचारला, तर किचकट पातळी गाठणारे आजारही वेळेत नियंत्रणात आणता येतात. या कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर घोरपडे, विशाल ढाणे, भाग्यश्री ढाणे, डॉ. पल्लवी पीसाळ, संध्या चौगुले, सतीश बुद्धे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.