सातारा : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनमानीपणा झाला आहे. त्यामुळे या गैरप्रकाराबद्दल साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनीही आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. या भूमिकेस आता सातारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती अध्यक्ष काका पाटील यांनी दिली.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषद अंतर्गत २०२५-२६ वर्षातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यात अधिकाऱ्यांनी मनमानीपणे केल्या आहेत. जागा रिक्त आहेत, पण त्या न दाखवता किंवा रिक्त दाखवूनही तिथे तुम्हाला जाता येणार नाही, असे कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना न्यायीक असलेल्या बदल्यास हरताळ फासण्याचे काम प्रशासन करीत आहे. वास्तविक जिल्हा परिषदेतील अधिकारी मंत्रालयात बसून स्वत:च्या बदल्या पाहिजे त्या ठिकाणी करून घेण्यात सक्षमपणे काम करतात. मात्र, येथे चुकीचे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या टोकावरूनही बदलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा थोडाही विचार अधिकारी करत नाहीत. रात्री उशिरापर्यंत बदल्याचा घाट घातला जातो. बदल्या झाल्यानंतर याबाबत काही तक्रार किंवा म्हणणे मांडायचे असल्यास हेच अधिकारी रजेवर किंवा फिरतीवर जातात. बदल्या झाल्यानंतर अधिकारी कार्यालयाकडे फिरकत नाहीत, हा संघटनेचा अनुभव आहे.
प्रशासनाने काही संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती केलेली आहे. राहिलेल्या संवर्गाच्या पदोन्नतीबाबत प्रशासनाकडून वेळकाढूपणााचे धोरण राबविले जात आहे. समक्ष भेटूनही काय कार्यवाही केली याबाबत प्रशानाकडून माहिती दिली जात नाही. यामुळे वर्षानुवर्षे पदोन्नतीपात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय्य असलेल्या पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे. वर्षातून होणाऱ्या निवारण समितीच्या बैठकीत संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या मागणीवर कधीच कार्यवाही होत नाही. तसेच याबद्दलच्या कार्यवाहीची माहिती संबंधितांनाही कळवली जात नाही. आता सामजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या बदली विरोधातील आंदोलनास महासंघाचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे पाटील यांनी सांगितले.