सातारा : भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यात प्रचंड ताकद वाढली आहे. लोकसभेत कार्यकर्त्यांनी जो चमत्कार घडवला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक झाली आणि युतीचे आठ आमदार निवडून आले. यासाठी भाजपची प्रचंड संघटन शक्ती याला कारणीभूत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी हीच शक्ती दाखवावी, असे कळकळीचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी सदस्य नोंदणी अभियान आणि स्वर्गीय नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सातार्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, राज्य कार्यकारिणीचे सचिव भरत नाना पाटील, लोकसभा राज्य समन्वयक सुनील काटकर, कराड उत्तरचे नेते विनायक वेताळ, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी उपनगराध्यक्ष अविनाशदादा कदम, भाजप पक्षप्रतोद सिद्धी पवार, माजी सभापती आशा पंडित इत्यादी यावेळी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अजूनही कॅबिनेट मंत्रीपदाची सवय नसून आमदार नामदार ऐकण्याची सवय नव्हती. राज्य कार्यकारिणीने फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. कार्यकर्त्यांची ताकद हा जिल्ह्याचा बहुमान आहे. पूर्वी सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये कार्यकर्त्यांनी संघटन शक्ती दाखवत जिल्ह्याच्या रचनेत आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळे हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे व फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील हे सुद्धा भाजपचेच आमदार आहेत. केवळ तांत्रिक दृष्ट्या ते शिंदे गट व अजित दादा पवार गटांमध्ये उमेदवारीच्या दृष्टीने सामील झाल. मात्र महायुतीच्या उमेदवारांमध्ये कोणताही दुजाभाव नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास पुढे नेणार आहोत. भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीने सातारा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपदे देऊन जबाबदारी वाढवली आहे. मुख्यमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला वेळ देऊन सभासद नोंदणी अभियानाचे काम पूर्ण करत आहेत. आगामी नगरपालिका निवडणुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. सातारा जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असेल, अशी स्पष्ट ग्वाही शिवेंद्रसिहराजे यांनी दिली.
यावेळी मान्यवरांचा जिल्हा कार्यकारणीच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार यांनी सभासद नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगितली. धैर्यशील दादा कदम यांनी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना समजावून सांगत पाच लाख उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन केले.
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.