सातारा : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून एकदा सौर प्रकल्प बसवला तर पुढची 25 वर्षे वीजबिलाची चिंता दूर होईल. शिवाय या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. अगदी पत्र्याच्या घरावर सुद्धा सौर पॅनल बसवता येतात. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्वच घरगुती वीजग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका सौ. नीता केळकर यांनी आज (दि. 28) सातारा येथे केले.
सातारा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 व प्रधानमंत्री
सूर्यघर योजनेचे मोठे काम महावितरणतर्फे सुरु आहे. या प्रमुख योजनांसह
महावितरणतर्फे सुरु असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यासाठी सौ. निता केळकर यांनी
सातारा येथे आढावा बैठक घेतली. मंगळवारी दुपारी मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ
सातारा (मास) यांच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सौ. केळकर यांनी ग्राहक संघटना व
उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या. तसेच त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना
प्रशासनाला दिल्या व धोरणात्मक प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्राहक
प्रतिनिधींना दिले.सौ. केळकर म्हणाल्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना वेग दिला
आहे. सातारा जिल्ह्यात 208 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यातील
बिजवडी व धोंडेवाडी येथे प्रत्येकी 5 मेगावॅट असे 10 मेगावॅटचे प्रकल्प
सुरु देखील झाले आहेत. तसेच मागेल त्याला सौरपंप योजनेतून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानातून
सौरपंप दिले जात आहेत. तर घरगुती ग्राहकांसाठी सूर्यघर योजनेची अंमलबजावणी केली
जात आहे.सूर्यघर योजना घरगुती ग्राहकांना विजेच्या दृष्टीने
स्वावलंबी करणारी आहे. सूर्यघर योजनेसाठी 1 किलोवॅटला 30 हजार, 2 किलोवॅटला 60 हजार तर 3 किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांचे
अनुदान मिळते. या योजनेला अनेक राष्ट्रीयकृत बँकाही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा
केला जातो. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून एजन्सी निवडण्याचे स्वातंत्र्यही
ग्राहकालाच असल्याचे सौ. केळकर यांनी सांगितले.बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी भाजपा जिल्हा
सचिव महेंद्र कदम, मासचे अध्यक्ष संजोग मोहिते, सचिव दिपक पाटील, पूर्व अध्यक्ष
राजेंद्र मोहिते, भरत शेठ, महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांची प्रमुख
उपस्थिती होती. तर ग्राहक व उद्योजक प्रतिनिधी यांचेसह सर्व विभागांचे कार्यकारी
अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरची सुरुवात उद्योजकांपासून करा : भरत शेठसरकारी गायरान जमीनीवर होणाऱ्या सौर प्रकल्पालाही काही स्थानिक विरोध करतात. त्यांच्या विरोधाची कारणे वेगळी आहेत. मात्र स्मार्ट मीटरला नाहक विरोध होतोय. स्मार्ट मीटरचे भरपूर फायदेच आहेत. शिवाय ते मोफत बदलून दिले जात असल्याने आपण बदल स्विकारला पाहिजे असे आवाहन सौ. निता केळकर यांनी केले. तेंव्हा उद्योजकांतून भरत शेठ यांनी साताऱ्यात स्मार्ट मीटर बसविण्याची सुरुवात आम्हा उद्योजकांपासून करण्याची आग्रही मागणी केली. त्यास उपस्थितांनी सहमती दर्शवली.