नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय. नव्या सरकारमध्ये 39 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्री आहेत. भाजपमधील 19 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या शिवसेनेतील 11 नेत्यांनी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलने फक्त हा छगन भुजबळ यांच्यावरचा अन्याय नाही तर तो ओबीसी चळवळीवरचाच अन्याय आहे, असं मत काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. सरकारवर व त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवायला विरोधी पक्ष सभागृहात गरजेचा असतो. विधानसभा अध्यक्ष राज्य सरकारने बनवला असतो. त्यामुळे विरोधीपक्ष नेता बनवने हे राज्य सरकारच्या इच्छेवर अवलंबून असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या अन्याय झाला आहे. त्यांना संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. ते विरोधात एकटे आमदार असतांना सभागृह गाजवून टाकायचे. त्यांच्या पक्षात काय स्पर्धा आहे यावर मी बोलणार नाही. मात्र मी त्यांच्यासोबत काम केले आहे छगन भुजबळांवर अन्याय झाल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अमोल मिटकरी म्हणाले, भुजबळ नाराज नाहीत चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील 'जहा पर मन नही लगता वाहा पर क्या रहना' तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की ' तेरे बिना दिल नही लगता'. भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल नाही याचा अर्थ असा की अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार कुणावर अन्नाय करत नाहीत.