सातारा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारा महाबळेश्वर येथे आयोजित ‘महापर्यटन उत्सव-२०२५’ चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षाभारतील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आदी उपस्थित होते.
पर्यटन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचे सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचे आहे.
शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर मिलाफ महाबळेश्वर येथे पाहायला मिळतो. निसर्गाने सुंदर पश्चिम घाट आपल्याला दिला आहे, ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला आहे, अनेक सुंदर पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्याकडे आहेत, हे सौंदर्य देश परदेशात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि हा महोत्सव त्यादृष्टीने महत्वाचा आहे.असे याववेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण करण्यात आले. पर्यटन महोत्सवला सहकार्य करणाऱ्या क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्ष मनीषा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जपानचे कौन्सीलेट जनरल यमाशीता सान, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, संचालक डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन महोत्सवाच्या ब्रँड अॅम्बेसेडर मृणाल कुलकर्णी, नवेली देशमुख, समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटनस्थळ
महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. . पुढचा पर्यटन महोत्सव कोयनेच्या बॅक वॉटर परिसरात घेऊन तेथील संस्कृतीचा पर्यटकांना परिचय करून देण्यात येईल, असे श्री. फडणवीस म्हणाले. पर्यटनाच्या क्षेत्रातील स्कुबा डायव्हिंगसारख्या नव्या कल्पना पुढे आणून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना बॅकवॉटर संबंधी असणारी बंधने दूर केल्याने तेथे चांगली पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथे आयोजित वेव्हज परिषदेमुळे क्रिएटर्स इकॉनॉमिमध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका अदा करेल, असा विश्वास व्यक्त करताना आपल्या सांस्कृतिक विविधता कंटेन्ट क्रिएटर्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत. पर्यटकाला स्थानिक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिल्यास पर्यटक त्या त्या भागाकडे वळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.