सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत. विधानसभा मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क, विकासकामांची तगडी जंत्री याच्या जोरावर आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदारकी मिळवणार का ? हा खरा प्रश्न आहे. मात्र विरोधकांकडून होणार्या टोकाच्या आरोपामुळे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे महाविकास आघाडी कितपत आव्हान देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2009, 2014 या दोन टर्म मध्ये कॉंग्रेस आणि 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात गोरे यांनी 3 हजार 295 मतांची आघाडी मिळवत पराभवाची नामुष्की टाळली होती. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मतदारसंघातून निंबाळकर यांना 23 हजार 365 मतांची आघाडी निंबाळकरांना मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले. त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे निश्चित आहेत. भाजपच्या नेत्यांची असलेली जवळीक, पुणे-बेंगलोर या नव्या कॉरिडॉर मुळे माण-खटाव मध्ये होणारे औद्योगिकरण, दुष्काळग्रस्त मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी केलेले प्रयत्न, जिहे कटापूर तसेच अन्य उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी शिवारात खेळणारे पाणी, हा मुद्दा त्यांच्यासाठी पाणीदार आमदार म्हणून निर्णायक ठरू शकतो.
प्रभाकर देशमुख सध्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. पवार यांनी त्यांना मोठी ताकद दिली आहे. यावेळी सर्व विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत त्यांना बळ मिळणार आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बाबा वीरकर, राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे अभयसिंह जगताप, प्रभाकर घार्गे, शेखर गोरे अशी मोठी फौज त्यांच्या विरोधात उभी आहे. मात्र महाविकास आघाडी कडून यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. आमदार जयकुमार गोरे यांना मधल्या काळात बर्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. खा. उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर होणार्या आरोपामुळे पक्षांतर्गत राजकारणाचा सामना करावा लागला. 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या सगळ्या घटनांना जयकुमार गोरे यांनी सामोरे जात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. माण-खटाव मतदारसंघात गोरे विरुद्ध देशमुख यांच्यात थेट लढत होऊ शकते, असे मानले जाते. महाविकास आघाडी मधील आणि ‘आमचं ठरलंय’ समूहातील ऐक्यावर देशमुख यांचे भवितव्य अवलंबून असेल.
2019 मधील उमेदवारांना मिळालेली मते -
जयकुमार भगवानराव गोरे
91 हजार 469 मते
मतांची टक्केवारी 40.16
प्रभाकर कृष्णाजी देशमुख
88 हजार 426 मते
मतांची टक्केवारी 38.82
शेखर भगवानराव गोरे
37 हजार 539 मते
मतांची टक्केवारी 16.48