निर्मल वारी व स्वच्छ वारी होण्यावर प्रशासनाने भर द्यावा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केली पाहणी

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच ही वारी निर्मल वारी व स्वच्छ वारी होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय डॉ. पुलकुंडवार यांनी आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची पाहणी केली. ह्या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांची उभारणी करावी अशा सूचना करून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, वारकऱ्यांना चांगले उपचार मिळावे यासाठी पुरेसा औषधसाठा ठेवावा. पालखीच्या अनुषंगाने सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. दूषित पाणी पुरवठा होणार नाही याची काळजी घ्यावी. पुरेसे मोबाईल स्वच्छतागृह पालखीतळाबरोबर विसाव्याच्या ठिकाणी  उभे करावेत. तसेच  स्वच्छतागृह वेळोवेळी स्वच्छ होतील याचीही दक्षता घ्यावी.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व विसाव्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त पालखीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी पालखी सोहळ्याला वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे.

वारकऱ्यांसाठी पहिल्यांदाच दहा हजार क्षमतेच्या वारकरी सेवा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबर आरोग्य यासह विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी तळावर पावसामुळे चिखल होऊ नये यासाठी मुरमीकरण करावे. यावर्षीचा पालखी सोहळा सर्व विभागाच्या समन्वयातून यशस्वी करावा.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र बोर्डच्या शाळा आता सकाळी 7 ऐवजी 9 वाजता होणार सुरू
पुढील बातमी
शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुरवाव्यात : जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

संबंधित बातम्या