पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यापूर्वीच पंढरपुरात वारकरी भाविकांची मोठी गर्दी वाढत असून, पंढरीत आलेला प्रत्येक भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतो. सध्या धरण क्षेत्र व पुणे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चंद्रभागेच्या पात्रात पाण्याची पातळी वाढलेली आहे. पात्रांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक भाविकांचा बुडून मृत्यू होत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंद्रभागा नदी पात्रात स्थानिक कोळी समाजातील युवकांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक केली आहे. विविध ठिकाणांहून आलेले पाच भाविक आंघोळीसाठी गेले होते. त्यानंतर चंद्रभागेच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडत होते. यावेळी सुरक्षारक्षक असलेले स्थानिक कोळी बांधवांनी क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेऊन आपत्कालीन बोटसोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बुडणाऱ्या पाच भाविकांचे प्राण वाचवले.
मागील आठवड्यात दोन भाविकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडे या ठिकाणी सुरक्षारक्षक व लाईफगार्डची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने मंदिर समितीने स्थानिक कोळी बांधवातील 13 जणांची सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती केली. या सुरक्षारक्षकांनी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून भाविकांना सूचना करत होते. परंतु, अचानक पाण्यात पडून बुडत असताना वृद्ध व्यक्तीला व इतर चार जणांना असे पाच भाविकांना वाचवून त्यांना जीवनदान देण्यात या सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.
पंढरपुरात चंद्रभागा पात्रामध्ये होडी चालक वाहक असलेले कोळी समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, चंद्रभागेच्या पात्रात नाव होडी चालवणे हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या भाविक वारकऱ्यांना पाण्याचा अंदाज न येऊन बुडत असताना वाचवून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य कोळी बांधव करत आहेत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा प्रशासनाने विचार करून चंद्रभागेच्या पात्रात कायमस्वरूपी कोळी समाजातील युवकांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होडी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश नेहतराव, वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले आहे.