अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

by Team Satara Today | published on : 13 December 2024


हैदराबाद :  सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाली. एकीकडे “पुष्पा 2” कोट्यवधींचं कलेक्शन करत असताना अल्लू अर्जुनला अटक झालं आहे. “पुष्पा 2” च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला आहे आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे या घटनेचा तपास करत असल्याचं, डीसीपी म्हणाले. या तपासादरम्यान अल्लू अर्जुनला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात अटक केली.

7 कोटींची कार असलेल्या अल्लूला पोलिसांनी अटकेवेळी Toyota मध्ये बसवलं. अल्लू अर्जुनच्या अटकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. या घटनेनं आता अल्लू अर्जुनच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि अल्लू अर्जुन- रश्मिका मंदान्ना यांची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अचानक चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. याच महिलेच्या मृत्यूप्रकरणी “पुष्पा-2” हिरो अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय रेवती या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा 13 वर्षांचा मुलगा जखमी झाला.

4 डिसेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासह थिएटरच्या प्रीमियर शोसाठी पोहोचला. असं सांगण्यात आले की, त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गर्दीला मार्ग काढण्यासाठी ढकलण्यास सुरुवात केली. त्यामुळे आधीच गोंधळलेली परिस्थिती आणखीनच बिकट झाली. चाहत्यांनी अल्लू अर्जुनला आतून फॉलो करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे नाट्यगृहाच्या खालच्या बाल्कनीत गोंधळ उडाला आणि काही वेळातच चेंगराचेंगरी झाली.

या चेंगराचेंगरीत रेवती आणि तिचा मुलगा गर्दीत अडकले. ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. खूप प्रयत्नानंतर दोघांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत रेवतीचा जीव गुदमरला होता. महिलेला सीपीआर देण्यात आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. अखेर दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात रेवतीला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मुलावर तेथे उपचार सुरू आहेत. सध्या तो धोक्याबाहेर आहे.

या अपघातानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105 आणि 118 (1) आणि कलम 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांनी सांगितले की, “तक्रारीनुसार या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन, थिएटर व्यवस्थापन आणि त्याच्या सुरक्षा टीमला आरोपी करण्यात आले आहे. त्या रात्री त्यांच्या सुरक्षा दलात कोण उपस्थित होते आणि लोकांना धक्काबुक्की कोणी केली, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली हे शोधून काढावे लागेल? आम्ही तिथे तैनात होतो आणि पोलिसांची कोणतीही चूक झाली नाही. तपास सुरू आहे.”


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुणबी समाजाचे क्रांतिकारी पाऊल !
पुढील बातमी
गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसवर झालेल्‍या हल्‍ल्‍यात 30 पॅलेस्टिनी ठार

संबंधित बातम्या