सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीला महायुती होण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला. परंतु, बोलावलेल्या बैठकीला भाजपचे कोणीही मंत्री, आमदार जिल्ह्यात असूनही आले नाहीत. आता ज्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली, त्यांच्याशी फक्त ओझरती चर्चा झाली आहे. तथापि, जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा सर्व निर्णय सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांच्या निर्णयानुसारच घेण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
सातारा येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार)चे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते.
शंभुराज देसाई म्हणाले, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्याशी आमची भेट झाली आहे. सर्व पक्षांच्या पक्षीय बलाबलाबाबत प्राथमिक चर्चा झाली. परंतु, अद्याप जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेबाबत काहीच ठोस चर्चा झाली नाही. त्याबाबत अद्याप ठरलेले नाही. तथापि, निवडणुकीपूर्वी मी पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीला आणि भाजपसमोरही हात पुढे केला. राष्ट्रवादीने आमच्या हात हातात घेतला. भाजपने हात पुढे केला नाही. आता निकालानंतर पुढे काय करायचे हा त्यांचा अधिकार असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले.
आम्ही विकासकामे, संपर्क, पक्षाचे धोरण आणि जिल्ह्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही की अरे-तुरे केले नाही. जे कोणी केले ते सर्वांनी पाहिले आहे. आम्ही जमिनीवर पाय ठेवून काम केले, असा टोला जयकुमार गाेरे यांचे नाव न घेतला लगावला. महायुतीची बैठक पालकमंत्र्यांनी लावल्यानंतर आम्ही बैठकीला जाऊ, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलले होते. मी ज्या दिवशी बैठक बाेलावली त्यादिवशी सर्व त्यांचे मंत्री, आमदार होते. त्यांनी माजी जिल्हाध्यक्षांना बैठकीला पाठवले. ते निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यांनी वरती विचारावे लागेल, असे सांगितले.
शंभुराज देसाई जिल्ह्यातील मोठे नेते : शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे म्हणाले, शंभुराज देसाई जिल्ह्यातील मोठे नेते असल्याचे सांगितले. त्यांनीच आता याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.जिल्हा परिषदेचे १५ सदस्य आणि पंचायत समितीचे २५ सदस्यांची पहिली बैठक आहे. त्या बैठकीत सदस्यांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगितले.