सातारा : काही वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातून सातारा येथे स्थायिक झालेल्या आणि आता सातारा हीच आपली कर्मभूमी मानणाऱ्या कुणबी समाजाचे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत नगरसेवक रवींद्र भैय्या ढोणे यांनी नुकतेच व्यक्त केले.
आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आमदार फंडातून आणि रवीभैया ढोणे यांच्या प्रयत्नातून साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये कुणबी समाज मंदिर उभे राहत आहे. या समाज मंदिराचे चौकट पूजनाचा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. एखादी नवीन वास्तू उभी राहत असताना सुवासिनी महिलांच्या हस्ते त्या वास्तु संबंधातील सर्व शुभकार्य केले जाते. मात्र ,कुणबी समाजाच्या या वास्तूचे चौकट पूजनाचा कार्यक्रम विधवा महिलांच्या हस्ते करून त्यांनाही समाजाच्या सर्व उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. ही घटना या समाजासाठी निश्चितच भूषणावह आहे. पतीच्या निधनानंतर दुर्लक्षित असणाऱ्या या महिलांनाही सन्मानाने जगता यावे. त्यांनाही समाजामध्ये मिसळता यावे. यासाठी कुणबी समाज संघाच्या जिल्हा बैठकीमध्ये समाजातील विधवा महिलांच्या हस्ते समाज मंदिराचे चौकट पूजनाचा कार्यक्रम व्हावा. अशी इच्छा समाजाचे अध्यक्ष भालचंद्र गोताड यांनी व्यक्त केली. त्याच बैठकीमध्ये इतर सर्व उपस्थित समाज बांधवांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानुसार नुकताच हा कार्यक्रम करण्यात आला. या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाचे कौतुक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रशांत पोतदार यांनी केले आहे.
कुणबी समाज संघ सातारा मार्फत प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. तसेच वेळोवेळी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतसुद्धा केली जाते. समाजामार्फत वधू-वर मंडळ सुद्धा चालवले जाते. हरित सातारा या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेच्या कामातही या समाजाचा मोठा वाटा आहे. समाज बांधवांच्या उन्नतीसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जात असतात. त्याला सर्व समाज बांधव आनंदाने सहभागी होत असतात. याप्रसंगी कुणबी समाज संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सर्वच सामाजिक स्तरातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अभिनंदन होत आहे.