सातारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणा-या मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक २६ मे ते १५ ऑगस्टदरम्यान या मोहिमेत विविध ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.
मोहिमेत केवळ मुलांची ओळख निर्माण न करता त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा, सामाजिक समावेश, कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा, सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत विविध तालुक्यांचे तहसिलदार, पोलीस, आरोग्य, शिक्षण, सामाजिक संस्था, बालकल्याण समित्या, विधिज्ञ, विधी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव बिना बेदरकर यांनी सदर मोहिमेकरिता जनसामान्य व सामाजिक संस्था यांनी सहभाग घेऊन निराधार मुलांविषयीची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा कार्यालयात पुरवावी असे आवाहन केले आहे.