सातारा : जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांविरोधात तक्रारी करुनही जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील चौकशी व वरिष्ठ अधिकार्यांकडून केवळ चौकशीचा फार्स तयार केला जात आहे. संशयितांची निष्पक्ष चौकशी करुन संबंधितांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करुन दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. तुषार मोतलिंग यांच्या मागण्यांना विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
सातारा येथील यांत्रिकी विभागातील अधिकारी यांच्या नियमबाह्य कामकाजाबाबत अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याकडे केल्या असता चौकशी समिती गठीत करून संबधित भ्रष्ट अधिकार्यांची चौकशी सुरू करण्यात आली. परंतु अद्याप या चौकशीबाबत कोणताही अहवाल सादर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. चौकशी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या वागणुकीवरून असे दिसत आहे की अधिकारी आनंद काळमेघ (कार्यकारी अभियंता), आनंद सावंत (उप कार्यकारी अभियंता), वैशाली बचुटे (शाखा अभियंता), वैशाली पाटील (प्रथम लिपिक) यांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे.
या संशयित अधिकार्यांनी मयत अधिकार्याच्या मृत्यू नंतर नामनिर्देशनात बदलून करून आईला आर्थिक लाभ मिळवून देण्यास बेकायदेशीर पद्धतीने कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत. तसेच पत्नीला मृत्यू नंतरचे लाभ व निवृत्ती वेतन देण्यास विलंब केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी पुराव्यानिशी तक्रार केली असता अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
याबाबत मोतलिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयामधील कामकाजाबाबत माहिती घेतली असता बरेच बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार उघडकीस आलेला आहे. या कार्यालयामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे आयुष्य व कुटुंब उद्ध्वस्त केले आहे व त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. कारण या कार्यालयातील अधिकार्यांचे भ्रष्ट कारभार उघड झाले होते व ते लपविण्यासाठी संबधित पीडित कर्मचार्यांनी मदत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु या कर्मचार्यांनी बेकायदेशीर कामे करण्यास नकार दिल्यामुळे खोटे गुन्हे, नियमबाह्य बदली, आर्थिक कोंडी, नियमबाह्य गोपनीय अहवाल बदलणे असे असंविधनिक कृत्य केले असून याची वरिष्ठांना कल्पना असून सुद्धा जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्व बाबतीत परिपूर्ण पुरावे घेऊन सर्व पीडित कर्मचार्यांना घेऊन न्याय मागण्यासाठी दिनांक 26 मे पासून मुख्य अभियंता जलसंपदा (यांत्रिकी) विभाग नाशिक यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, असेही मोतलिंग यांनी म्हटले आहे.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा पाठविण्यात आले आहे.