कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे यांची घेतली भेट

by Team Satara Today | published on : 25 December 2024


सातारा : ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. उदयनराजे यांनी गोरे यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गोरे यांच्या कामगिरीमुळे माणसारखा दुष्काळी तालुका हिरवाईने फुलू लागला आहे, याचा जिल्ह्याला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार काढले.

ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात भाजपचे स्वर्गीय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. तसेच तेथून ते थेट जलमंदिरला उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. उदयनराजे भोसले यांच्या वतीने जयकुमार गोरे यांचा शाल व शिवशिल्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आगामी वाटचालीसाठी उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी कामाची संधी दिली. हा मी माझा सन्मान समजतो. यापुढेही माझ्याकडून जबाबदारीने काम होत राहील. उदयनराजे भोसले हे जिल्ह्याचेच नव्हेतर राज्याचे नेते आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी येथे आलो होतो, असे ते म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, जयकुमार गोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून स्वतःला सिद्ध केले आहे. माणसारखा दुष्काळी तालुका हिरवागार करण्याच्या प्रयत्नात त्यांनी कोणतीही कसूर सोडली नाही. माण-खटाव हे दुष्काळी तालुके आता शिवाराने फुलून जातील. महायुतीने काम इतके प्रचंड वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे आगामी दशकभरामध्ये भारतीय जनता पार्टीची सातार्‍यातून सत्ता जाईल, असे वाटत नाही. महायुतीचे सर्व उमेदवार हे समन्वयाने काम करीत असून यापुढे जिल्ह्याचा नाहीतर महाराष्ट्राचा विकास होताना कोणतीही अडचण येणार नाही, असे माझे ठाम मत आहे. ज्यावेळी आमदार जयकुमार गोरे व खासदार उदयनराजे भोसले यांना कोणी ओळखत नव्हते, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि या मैत्रीत काही फरक पडलेला नाही, असे ते म्हणाले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा
पुढील बातमी
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण

संबंधित बातम्या