आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील

by Team Satara Today | published on : 18 September 2024


सातारा : आपल्या सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा आमदार आहेत. त्यापैकी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे एकटे वगळता सर्वांचे भवितव्य तीन महिन्यानंतर अंधारात आहे. इतर सात विधानसभा मतदार संघातल्या जनतेला तिथल्या आमदारांनी टाचेखाली घेतले गेले आहे. त्यामुळे जनताच त्यांना तीन महिन्यांनी टाचेखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्व सामान्य जनता महागाई, बेरोजगारी, शिक्षण यामुळे पिचली आहे. सात ही आमदारांना त्यांच्याच मतदार संघातील जनता धडा शिकवेल, असा अंदाज भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

पाटील म्हणाले, आपला सातारा जिल्हा हा एखाद्या देशासारखा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एका बाजूला दुष्काळी ओसाड खटाव माण आणि दुसऱ्या बाजूला डोंगरदऱ्यांचा अति पावसाचा पाटण, महाबळेश्वर, जावळी हा भाग. सांगायचे तात्पर्य असे की, पाच वर्ष पाठीमागे वळून बघताना जे आता जिल्ह्यातील आमदार म्हणून आहेत, त्यापैकी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे वळगता इतरांची कामगिरीचा आलेख पहिला तर खालावलेला दिसतो. ज्यांच्या मतावर हे सात आमदार निवडून गेले होते, त्यांना पाच वर्षात सामान्य जनता दिसली नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आमदार मंडळींची खटपट राहिली आहे. आमदार मंडळींना जनतेला भेट द्यायला वेळ नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे तर सगळे निराळेच असते. ते फक्त एकट्या मरळी गावचे आणि पोवई नाक्यावरचे मंत्री आहेत. एक दिवस असा नसेल की, त्यांच्या ताफ्याचा त्रास सामन्य जनतेला झाला नसेल, पण सामान्य जनतेला काही अडचण असेल तर ते उठतातच, दुपारी 12 वाजता अन लगेच कुठं मंदिरात जातात. त्यामुळे ज्या अपेक्षेने मतदार त्यांच्याकडे जातो ती कामे होत नाहीत. तशीच अवस्था इतर सहा आमदारांची आहे. त्यांनी फक्त मतदार संघातले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांना पकडून ठेवले आहे. सामान्य मतदारांचे त्यांना काही देणे घेणे नाही. सामन्य जनता आजही होरपळून निघत आहेत. गावाकडील शाळा ओस पडल्या आहेत, चांगले शिक्षण नसल्याने चांगल्या नोकऱ्या नाहीत, किंवा आहे त्या शिक्षणावर नोकऱ्या देण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सात ही तालुक्यात विकसित नाही. जनता मात्र टाचा घासून उपाशी तडफडून मरत आहे. त्यामुळे त्या सात आमदारांचे तीन महिन्यानी येणाऱ्या निवडणूकीत भवितव्य धोक्यात आहे. मात्र, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. कधीही काळ्या रात्री बाबांना कोणी फोन करू द्या, कोणीही मदतीच्या अपेक्षेने त्यांच्या सुरुची निवासस्थानावर गेल्यावर मोकळ्या हाताने कोणीही माघारी जाणार नाही. सामान्य लोकांचे हित जपणारे आणि जाणारे बाबाराजे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, बाकीच्या सात आमदारांचे आता गावोगावी दौरे सूरु होतील, लोकांना भुरळ घालणे सुरू करतील पण लोक त्यांना भुलणार नाहीत, त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे ही पाटील यांनी म्हटले आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव
पुढील बातमी
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने

संबंधित बातम्या