सातारा : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२३ साठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा निर्णय घेऊन केवळ एक रुपयांत अधिसूचित पीकास विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून या योजनेत एक लाख शेतकऱ्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील असून ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी या विमा योजनते सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कृषी अधीक्षक फरांदे पुढे म्हणाले, योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग,खरीप कांदा अशा एकूण ९ पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. २०२३-२४ पासून 'सर्वसमावेशक पिक विमा योजना' राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.
शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा, खाते उतारा (8 अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरायचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. पीक पेरणी न झाल्यासही विमा काढता येईल त्यासाठी स्वयंघोषणापत्र देऊन पेरणीची संभाव्य तारीख त्यात नमूद करणे आवश्यक आहे. भातासाठी ४१ हजार रुपये प्रति हे., खरीप ज्वारी २० हजार प्रति हे., बाजरीसाठी १८ हजार प्रति हे., नाचणी २० हजार प्रति हे., भुईमूग ४० हजार प्रति हे., सोयाबीन ३२ हजार प्रति हे., मूग २५ हजार ८१७ प्रति हे., उडीद २६ हजार प्रति हे., खरीप कांदा ४६ हजार प्रति हे. एवढी रक्कम विमा संरक्षित म्हणून दिली जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत सातारा तालुक्यातून ४१५९, कोरेगाव १२०२, खटाव ७२२९, कराड ३१७६, पाटण १२२०, वाई १४५०, जावली ६१७, महाबळेश्वर ७१, खंडाळा १४५२, फलटण २९०९, माण १०४९९ शेतकऱ्यांना सहभागी घेतला आहे.
नुकसान झाल्यानंतर पात्र लाभार्थी अपात्र होऊ नये, यासाठी दक्ष राहणार असून गरज पडल्यास ड्रोन सिस्टिमची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत असून जिल्हयातून १ लाख शेतकऱ्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील असल्याचेही कृषी अधीक्षक फरांदे यांनी सांगितले.
पीक विमा योजनेत एक लाख शेतकऱ्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील : कृषी अधीक्षक फरांदे
by Team Satara Today | published on : 22 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा