सातारा: २०२३ साली मांडवे ,ता. सातारा येथे वनविभागाच्या हद्दीत वनवा लावणाऱ्या एकाला कारवाईतून वाचवण्याचे प्रयत्न तब्बल एक वर्षापासून कुसवडे बीटातील वनपाल आणि वनरक्षक करीत असल्याने वनविभागात कुंपणच खातेय शेत अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येऊन ठेपली आहे. संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांच्या बाबत तक्रारींचा पुर वाहत असून वनवा प्रकरणांमध्ये संबंधित संशयिताच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्याला बाइज्जत बरी केल्यामुळे कुसवडे बीटातील वनपाल, वनरक्षक फोडताहेत सुपार्य? अशा खमंगदार चर्चा पठार भागात सुरू झालेल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाची जिल्ह्याच्या डीसीएफ आदिती भारद्वाज यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मार्च ते मे २०२३ दरम्यान मांडवे, ता. सातारा येथील एका संशयित शेतकऱ्याने स्वतःच्या मालकी हक्कामध्ये म्हणजेच शेतात वणवा लावला होता. तो वणवा पुढे सरकत वनविभागाच्या हद्दीत गेला. तब्बल तीन दिवस हा वणवा आटोक्यात ऐत नव्हता. जवळपास ३०० हेक्टर वनविभागाचे क्षेत्र त्यामध्ये जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन विभागाच्या जमिनीचे एवढे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन ही वनपाल आणि वनरक्षकाने वणवा प्रकरणातील संशयित शेतकऱ्याला पाठीशी घालत त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन या प्रकरणाबाबत लोकप्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमे अथवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची कोणतीही चर्चा करू नका अशा सूचना संशयित शेतकऱ्याला केल्या. वास्तविक एवढी मोठी घटना घडू नये ती घटना कागदावर आली नाही. ती आली असती तर त्याच्या कोणत्याही नोंदी सातारा वन विभागाच्या कार्यालयात नसल्याचे सांगण्यात येत आहे. वनपाल आणि वनरक्षक यांनी संबंधित संशयित शेतकऱ्याला सातारा वन विभागाच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असताना तसे न करता वणवा प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवले असल्याच्या चर्चा आता उघडपणे झडू लागल्या आहेत. या प्रकरणाची नोंद वन विभागाच्या कार्यालयात का झाली नाही? झाली असेल तर संबंधित शेतकऱ्याला किती दंड झाला अथवा शिक्षा झाली, त्याची कोणतीही माहिती माध्यमांपुढे आली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात फार मोठा झोल केला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे वनाचे रक्षकच भक्षक होऊ लागल्यास सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न पठार विभागातील ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
वनपाल शेतकऱ्यांसाठी त्रासदायक
परळी वनविभागाच्या परिमंडल कार्यालयाचे वनपाल यांचे अनेक कारणामे यापूर्वीही माध्यमांमधून उघड झाले आहेत मात्र त्यांनी आपल्या कामात कोणतीही सुधारणा केली नसल्याचे दिसून येत आहे. पठार भागामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यापूर्वीचे सर्वच वनपाल शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे मात्र सध्याचे धनपाल शेतकऱ्यांचे नुकसानीचे प्रस्ताव पूर्ण होऊ देत नाहीत. ते प्रस्ताव निष्कासित करण्यावर त्यांचा फार मोठा भर असतो. काही वनरक्षकांना टॉर्चर करण्यावर त्यांचे अधिक लक्ष असते अशी माहिती वनविभागाच्या सूत्राकडूनच मिळत आहे.
आदिती भारद्वाज संबंधित दोघांवर कारवाई करणार का?
सध्याच्या डीसीएफ आदिती भारद्वाज या अत्यंत कडक शिस्तीच्या मानल्या जातात. कामात हायगय पणा त्यांना अजिबात चालत नाही, असे सांगितले जाते. जावली तालुक्यात वणव्या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना दोन महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यापेक्षा मांडवे येथील वणवा प्रकरण अत्यंत भयंकर आहे. त्यामध्ये वन विभागाचे फार मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. आता आदिती भारद्वाज या प्रकरणाची दखल घेणार का? संबंधित दोघांची चौकशी करून त्यांना निलंबित करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.