सातारा : सातार्याची जनता ही परिवर्तनशील आहे. सातारा शहरात विकासकामे होत नसल्याने सत्ताधार्यांच्या आश्वासनांना मतदार कंटाळले आहेत. रोजच्या पदयात्रांमधून आम्हाला त्याचा अनुभव येतो आहे. महाविकास आघाडी सातार्यामध्ये एकजुटीने एकदिलाने प्रचार करत आहे. त्यामुळे ती निश्चित येथे परिवर्तन घडवेल, असा ठाम विश्वास महाविकास आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.
सातारा शहरातील मोती चौक, यादोगोपाळ पेठ सोमवार पेठ येथील पदयात्रा त्यानंतर कदम पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, ग्राहक संरक्षण सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रणव सावंत, सादिक बागवान, सागर रायते, रवींद्र भणगे इत्यादी उपस्थित होते.
पदयात्रा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमितदादा कदम पुढे म्हणाले, सातारा शहर व तालुक्यांचा विकास गुणवत्ता असूनही म्हणावा तसा झालेला नाही. येथील जनता परिवर्तनशील आहे. रोजच्या संवाद सत्रांतून तसेच नागरिकांच्या मनोगतातून त्यांच्या व्यथा-वेदना पुढे येत आहेत. सातारा शहरालगतच्या उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे आता खरोखर परिवर्तनाची वेळ आहे. सत्ताधार्यांच्या येथील आश्वासनांना जनता कंटाळली आहे. त्यांच्या मतांची ताकद बॅलेट युनिट मधून दिसून येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि मित्र पक्ष एकदिलाने काम करीत आहेत. ती आघाडी अभेद्य आहे. त्यामुळे कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. ही एकजूट ताकद सातारा जावली मतदारसंघांमध्ये निश्चित परिवर्तन घडवेल. येत्या 20 तारखेलाच परिवर्तनाच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
अमितदादा कदम यांची मोती चौक, गोल मारुती चौक, सुपनेकर बोळ, न्यू इंग्लिश स्कूल चौक, यादोगोपाळ पेठ, व्हीनस कॉर्नर, फुटका तलाव परिसर, समर्थ हॉस्पिटल, मारवाडी चौक येथे तब्बल दोन तास झंझावाती पदयात्रा झाली. या पदयात्रेमध्ये नागरिकांनी अमितदादा कदम यांच्या या शिव संवाद यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला.