सिक्कीममध्ये दोन आठवड्यांपासून आणखी एक जोडपे गायब

by Team Satara Today | published on : 13 June 2025


मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी यांचा त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि काही साथीदारांनी मिळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजाची हत्या करून सोनम तब्बल १५ दिवस बेपत्ता होती. पण पोलिसांनी सापळा रचत सोनमसह तिच्या साथीदारांनाही अटक केली. यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकऱणानंतर आता सिक्कीम येथे हनिमूनसाठी गेलेले आणखी एक जोडपे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

नवविवाहित जोडपे कौशलेंद्र प्रताप सिंह (वय ३२) आणि अंकिता सिंह (वय अंदाजे ३०) हे त्यांच्या हनिमूनसाठी सिक्कीमला गेले होते. परंतु २९ मे रोजी गंगटोकहून परतताना त्यांचे वाहन मुनशिथांग परिसरात १००० फूट खोल दरीत कोसळून थेट तीस्ता नदीत वाहत गेले. या अपघातात हे दोघे बेपत्ता झाले असून त्यांचा दोन आठवड्यांपासून शोध सुरू आहे.अपघातग्रस्त व्हॅनमध्ये एकूण ११ पर्यटक होते. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले, एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर उर्वरित आठ जण बेपत्ता आहेत. या आठ बेपत्त्यांमध्ये कौशलेंद्र व अंकिता यांचाही समावेश आहे.

या घटनेनंतर कौशलेंद्रचे वडील शेर बहादूर सिंह, सुनेचा भाऊ सौरभ सिंह आणि इतर नातेवाईक गंगटोकला पोहोचून लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात होते. घटनास्थळी बचावकार्यही सुरू झाले. मात्र खराब हवामान आणि वादळी पावसामुळे शोधमोहीमेत अडथळे येत होते. शेर बहादूर सिंह म्हणाले की, “सीआरएफचे बचावकार्य मध्येच थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी वाहनही गायब होते आणि शोधपथकेही दिसली नाहीत.”

हवामान खात्याने २२ मे रोजी रेड अलर्ट दिलेला असतानाही पर्यटकांना त्या भागात पाठवण्यात आले, यावर त्यांनी सिक्कीम प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

शोधाशोध निष्फळ ठरल्याने प्रतापगडमधील रहाटीकर गावात दुःखाचे सावट पसरले आहे. कौशलेंद्र यांची आई बेबी सिंह वारंवार बेशुद्ध पडत आहेत, तर वडील शेर बहादूर “आता मला फक्त देवाचाच आधार आहे” असे म्हणत भावनिक अवस्थेत आहेत.कौशलेंद्र यांचे आजोबा, भाजप नेते डॉ. उम्मेद सिंह यांनी सांगितले की, माँ दुर्गेश्वरी धाम येथे ५१ हजार महामृत्युंजय जपाचा धार्मिक विधी सुरू करण्यात आला असून संपूर्ण गाव त्यांच्या सुस्थित परतीसाठी प्रार्थना करत आहे.  मात्र, भाजप कार्यकर्ते असूनही सरकारी पातळीवर कोणतीही मदत मिळालेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्याशी संपर्क साधला. तिवारी यांनी सिक्कीमच्या राज्यपालांशी संपर्क साधून सहाय्याची विनंती केली.कौशलेंद्र आणि अंकिता यांच्या सामानाचे हॉटेलमधून हस्तगत करण्यात आले आहे. मात्र, ते नदीत वाहून गेले असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीत, अशी माहिती त्यांच्या काका दिनेश सिंह यांनी दिली.

सिक्कीमच्या प्रशासनानुसार, मंगन जिल्ह्यातील मुनशिथांग परिसरात ११ पर्यटकांना घेऊन जाणारे वाहन दरीत कोसळले. एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले, तर आठ जण अद्याप बेपत्ता आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव महामार्गावरील पुलांची कामे सुरू करा
पुढील बातमी
अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आडनावाबद्दल चर्चेत

संबंधित बातम्या